सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष
गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
सावर्डे मतदारसंघातील मिराबागवासीयांचे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेले नियोजित बंधाराविरोधातील आंदोलन सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. आंदोलन तीव्र करण्याच्या इराद्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी पणजीतील आझाद मैदानावर धडक देण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनकाळात विधानसभेवर धडक देण्याचीही तयारी केली आहे.
जलसंपदा खात्यातर्फे सुमारे २८० कोटी रुपये खर्चून याठिकाणी बंधारा उभारला जात आहे. जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी अद्याप आंदोलकांची भेट घेतलेली नाही, तसेच स्थानिक आमदार व सभापती डॉ. गणेश गावकर यांनीही आंदोलकांकडे पाठ फिरवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या विषयावर तोडगा काढतील असे सांगितले असले तरी, आंदोलकांचा सामना करण्यास सरकारतर्फे कुणीच पुढे आलेले नाही. त्यामुळे विचित्र परिस्थिती उद्भवली असून, आंदोलकांच्या संयमाचा अंत होऊन आता हे आंदोलन पणजीत नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आंदोलनाचे नेते संकेत भंडारी यांनी पत्रकारांसमोर ही माहिती दिली.
जलसंपदा खात्याचे सहाय्यक अभियंता शांताराम गावकर यांनी सोमवारपासून ठेकेदाराने खोदलेला खड्डा भरायला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु त्याबाबत काहीच झालेले नाही. फक्त टिनच्या पत्र्यांचे कुंपण घातले गेले आहे. या खड्ड्यातील साचलेले पाणी लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून, डास व जलजन्य रोगांचे केंद्र बनले आहे. याबाबत कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारीही त्यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) यांनी मिराबाग येथे पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यासाठी ठेकेदाराला दिलेली ना हरकत मागे घ्यावी, असे आवाहनही भंडारी यांनी केले. सर्व सरकारी अधिकारी, स्थानिक आमदारांसह, या प्रश्नावर व आंदोलनावर गप्प का आहेत? सरकारचे हे मौन नेमके काय दर्शवते, असा सवाल मंगळदास नाईक यांनी केला आहे. कुठल्याही परिस्थितीत, काहीही झाले तरी, प्रकल्प रद्द झाल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.





