
ढवळीकरांनी घेतली बी.एल. संतोष यांची भेट
गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)
नवी दिल्लीत भाजपच्या वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात परतले असता, मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि त्यांचे बंधू तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मात्र दिल्ली गाठली आहे. पक्षाचे संघटन महासचिव बी.एल. संतोष यांची भेट घेऊन भाजप-मगो युती तसेच मगोला लक्ष्य बनवण्याच्या प्रकारांबाबत प्रदीर्घ चर्चा केल्याची खबर आहे.
मुख्यमंत्र्यांचे शरसंधान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदारसंघानंतर प्रियोळ मतदारसंघात अप्रत्यक्ष मगो पक्षावर शरसंधान साधले. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी एका ठरावीक मर्यादेपर्यंत हे ठीक असले तरी यातून आघाडी घटकाची बदनामी आणि कोंडी करण्याचा प्रकार घडल्याची नाराजी ढवळीकरांनी बी.एल. संतोष यांच्याकडे बोलून दाखवल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन प्रियोळचे आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी तर थेट ढवळीकरांवर हल्लाबोल चढवला. निवडणुकीसाठी दोन वर्षे बाकी असतानाच आत्ताच हा पवित्रा घेण्याचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच मगो पक्षाने तात्काळ भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि मगो पक्ष सरकारसोबत आहे. भाजप-मगो युती होणे ही काळाची गरज आहे. भाजपने मगोशी युती तोडण्याचे काय परिणाम होऊ शकतात हे भाजपने यापूर्वी अनुभवल्याने त्या अनुषंगाने विचार करून सावध पावले टाकावीत, असा सल्लाही ढवळीकरांनी बी.एल. संतोष यांना दिल्याची खबर आहे.
मुख्यमंत्र्यांचा युटर्न
प्रियोळात मगो पक्षाला थेट सरकारात राहायचे असेल तर राहा, अन्यथा चालते व्हा असे म्हणण्यापर्यंत मजल गाठली. या वक्तव्यामुळे ढवळीकरबंधू बरेच अस्वस्थ झाले. या वक्तव्याची दखल घेऊन त्यांनी लगेच दिल्लीत संपर्क करून बी.एल. संतोष यांची भेट मागितली असता त्यांना तात्काळ भेट मंजूर करण्यात आली. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी भाजपला मगोची गरज नाही, असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यात री ओढण्याचा प्रयत्न केला. या टीकेची खबर थेट दिल्ली पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सावधगिरीचा इशारा श्रेष्ठींनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट स्थानिक पत्रकारांशी संपर्क करून भाजप-मगो युती कायम राहील आणि याबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पक्षाच्या पारंपरिक आघाडी घटकांना अजिबात दुखवू नका, असा इशाराच श्रेष्ठींनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती मिळते.
मंत्रिमंडळ बदलावर शिक्कामोर्तब
राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. ५ ते ७ एप्रिल दरम्यान हा बदल केला जाणार आहे. या बदलानुसार दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून नव्या दोन मंत्र्यांची वर्णी लागणार असल्याची खबर आहे. या मंत्रिमंडळ बदलामुळे सरकारात नाराजी पसरणार आहे आणि पुढील दोन वर्षे मुख्यमंत्र्यांसाठी मोठी कसरत ठरणार असल्याचेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.