सोमवारी संपूर्ण संकुलाची पाहणी
गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी)
दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा निवासी संकुलात झालेल्या अतिसार (डायरिया) उद्रेकामुळे सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषित बोअरवेल सील केली आहे. विविध सरकारी यंत्रणा आणि स्थानिक पंचायतीकडून सोमवारी पाहणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
१२ मार्चपासून आतापर्यंत एकूण १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. दोन रुग्णांना टायफॉईड झाल्याचा संशय असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कुठ्ठाळी आरोग्य केंद्राकडून संकुलातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांना आवश्यक औषधे, ओआरएस तसेच नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने संकुलातील पाच इमारतींमधील ३२८ फ्लॅट्समध्ये तपासणी केली आहे.
सांडपाणी प्रकल्पाच्या बिघाडामुळे पाण्याचे दूषितीकरण
जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तपासणी करून बोअरवेल सील केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंबंधीची कारवाई गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे केली जाणार आहे. मंडळाकडून बिल्डरला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
प्रदूषण उल्लंघन उघड
१६ मार्च रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या कार्यरत नसल्याचे आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये बीओडी, सीओडी, अमोनियाकल नायट्रोजन, सस्पेंडेड सॉलिड्स आणि फिकल कोलिफॉर्म यांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले. मंडळाने बिल्डरला तत्काळ सांडपाणी सोडणे थांबवण्याचे निर्देश दिले असून, प्रकल्प पूर्ववत कार्यान्वित होईपर्यंत सांडपाणी सरकारी प्रकल्पाकडे पाठवण्यास सांगितले आहे. तसेच, प्रकल्पाकडे ‘कन्सेंट टू ऑपरेट’ नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दंड नोटीस व ४८ तासांची मुदत
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बिल्डरला सुमारे ४४.५ लाख रुपयांची पर्यावरण भरपाई आणि १२.५ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड प्रस्तावित करत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी यंत्रणांकडून बिल्डरला संरक्षण
प्रभू व्हायोलेटा संकुलातील या प्रदूषित पाण्यासंबंधी यापूर्वी अनेकदा सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु बिल्डरकडून रहिवाशांवर उलट्या तक्रारी करून स्थानिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे मुकाट्याने हे सगळे सहन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचेही लोकांनी सांगितले.






