नितेश राणे प्रकरणी पोलिस, अभियोग सपशेल अपयशी
गांवकारी, दि.२५ (प्रतिनिधी) :
धारगळ-पेडणे येथील २०१३ सालच्या टोलनाका तोडफोड व कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात सरकारी पक्षाच्या एकाही महत्त्वाच्या साक्षीदाराने आरोपींची ओळख पटविली नाही. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये परस्पर विसंगती दिसून आल्याचे नमूद करत म्हापसा न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्यासह नऊ आरोपींना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता दिली.
तपास यंत्रणा, अभियोगाचा पोलखोल
निकालाचा अभ्यास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. न्यायालयाने नमूद केले की, सरकारी पक्षाने तपासलेल्या महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी कोणीही सरकारी वकिलांच्या दाव्याला पाठिंबा दिला नाही. इतकेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक पुरावेही निष्फळ ठरले. त्यामुळे आरोपींनीच कथित मारहाण केल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.
सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, ३ डिसेंबर २०१३ रोजी तीन वाहनांतून आलेल्या आरोपींनी धारगळ टोलनाक्यावर बेकायदेशीर जमाव जमवून कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या, थपडा तसेच स्क्रू-ड्रायव्हरने मारहाण केली होती.
मात्र, न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी निकालात नमूद केले की, सरकारी पक्षाचा युक्तिवाद विस्कळीत होता. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये एकवाक्यता नव्हती. नेमकी घटना काय आणि कशी घडली हे तपासातून स्पष्ट झाले नाही.
साक्षीदार फिरले
या प्रकरणाचे विशेष म्हणजे, टोलनाक्यावर काम करणारे आणि तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीसह अनेक साक्षीदार तपासावेळी फिरले. टोल शुल्क आकारणी करणाऱ्या निरीक्षकालाही हल्लेखोर अथवा वाहने ओळखता आली नाहीत.
सीसीटीव्ही फुटेज निकामी
प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही सरकारी पक्षाला सादर करता आले नाही. सीव्हीआरमधील स्टोरेज हार्ड ड्राइव्ह निकामी झाल्याने त्यातील डेटा मिळवता आला नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
केवळ कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे सिद्ध करणे पुरेसे नसून ती आरोपींनीच केली हे दाखवणे आवश्यक होते. उपलब्ध पुरावे अपुरे ठरल्याने न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह अन्य आठ आरोपींना निर्दोष मुक्तता दिली.





