शिवोलीच्या गाभ्यातून उगम पावलेलं एक तडफदार, प्रेरणादायी युवा नाव म्हणजे श्री. कपिल किशोर कोरगावकर. तारचीभाट परिसराचा हा सुपुत्र आज गोव्यात समाजसेवेचे एक ठळक आणि प्रभावी अधिष्ठान बनला आहे. वाढदिवस हा फक्त वयाचा टप्पा नसतो; कपिल यांचे जीवन पाहिले, की तो समाजाच्या ऋणातून मुक्ततेचा एक सामाजिक सोहळा वाटू लागतो.
कपिल यांची समाजसेवेची परंपरा त्यांच्या आजोबांपासून सुरू झाली. ती सेवा त्यांच्या वडिलांनी पुढे नेली आणि आज कपिल हे ती तिसऱ्या पिढीतून अखंडपणे जपत आहेत. एम.एस्सी. इन ऑर्गेनिक केमिस्ट्री आणि एम.बी.ए. अशा दोन पदव्युत्तर शिक्षणासह त्यांनी वयाच्या २०व्या वर्षापासूनच समाजासाठी स्वतःला समर्पित केले आहे.
महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी परिषदेमधून त्यांच्या सामाजिक प्रवासाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, कार्यक्रमाचे आयोजन, नेतृत्वक्षमतेची पेरणी — हे सारे त्यांनी अत्यंत निष्ठेने केले. प्रा. प्राजल साखरदांडे या सुप्रसिद्ध इतिहासकाराचे मार्गदर्शन त्यांना लाभले, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक विचारांना एक दिशा मिळाली.
कपिल यांनी गोव्याला विशेष दर्जा मिळवण्यासाठी युवांच्या आंदोलनात पुढाकार घेतला. नारळाच्या झाडांच्या रक्षणासाठी ‘चिपको आंदोलन’, शापोरा नदीच्या जैवविविधतेसाठी ‘सह्यांची मोहिम’, आणि ग्रामस्तरावर ग्रामीण हक्कांचे रक्षण ही त्यांच्या सामाजिक नेतृत्वाची ठळक उदाहरणे आहेत.
शिवोलीच्या शांतता, संस्कृती आणि अस्मिता यांचं जतन करणे हीच त्यांची प्राथमिक भूमिका. म्हणूनच ओडीपी, प्रादेशिक आराखडा आणि मेगा प्रकल्पांशी संबंधित प्रस्तावांना त्यांनी ग्रामसभेच्या पातळीवर रोख धरला. त्यांच्या मते ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा झरा आणि युवांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यायलाच हवा.
पावसाळ्यात मोटरसायकल पायलट आणि मच्छीमार यांना रेनकोट, छत्र्या देणारा कपिल हा लोकहिताचा सच्चा वाहक आहे. स्थानिक टॅक्सी युनियनच्या समर्थक म्हणूनही त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
कोविड महामारीच्या काळात कपिल यांची माणुसकीची परीक्षा झाली. भयभीत समाजाच्या काळातही त्यांनी मास्क, औषधे, अन्नधान्य पुरवून हजारो लोकांना दिलासा दिला. ही सेवा केवळ मदतीची नव्हे, तर करुणेची होती.
आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कपिल यांनी वरदान ठरले. दरवर्षी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, युनिफॉर्म, शुल्क यासाठी मदत केली असून, आजवर ८००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी उज्वल भविष्याच्या वाटेवर मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी १२ वैद्यकीय शिबिरे, ५० अपंग रुग्णांसाठी सहाय्यक उपकरणे, अंगणवाड्या व शाळांसाठी किट्स, आणि महिलांसाठी “घरकान आमचो मान” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही सेवा सामाजिक कार्याच्या विविध अंगांनी समृद्ध आहे.
कपिल किशोर कोरगावकर हे मृदुभाषी, सर्वांचा सल्ला मानणारे, आणि सामूहिक कार्यशैलीत विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे सामाजिक भान, सातत्यपूर्ण कार्यतत्परता, आणि लोकांबद्दलची निष्ठा हीच त्यांना शिवोलीचा युवा ब्रिगेड बनवते.
श्री. कपिल किशोर कोरगावकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपले कार्य असेच अखंडपणे सुरू राहो, आणि समाजात नवचैतन्य निर्माण करत रहा हीच प्रार्थना.
– श्री.अक्षय गोलतेकर- शिवोली- बार्देश






