वाळपई, दि. १९ : वाळपई विधानसभा मतदारसंघातील युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांनी रविवारी उसगाव येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे वाळपई मतदारसंघातील काँग्रेसच्या संघटनात्मक आणि तळागाळातील कार्याला आणखी बळकटी प्राप्त होणार आहे. मिलिंद प्रभू यांच्या प्रवेशाने विश्वजीत राणे यांच्या वाळपई मतदारसंघाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात काँग्रेसने यश मिळवल्याची चर्चा सुरू आहे.
मिलिंद प्रभू यांचा पक्षप्रवेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष एम. के. शेख आणि आमदार ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप, गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक आणि गोवा सेवा दलाचे प्रमुख राजन घाटे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मिलिंद प्रभू यांचा सदस्यत्व अर्ज स्वीकारला. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षाचा ध्वज देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले.
मिलिंद प्रभू यांचे पक्षात स्वागत करताना गिरीश चोडणकर म्हणाले की, तळागाळात काम करणाऱ्या समर्पित सामाजिक कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश ही पक्षासाठी आनंदाची बाब आहे. प्रभू यांची सामाजिक क्षेत्रातील विश्वासार्हता, जनसेवा आणि लोककल्याणासाठी असलेली बांधिलकी यामुळे वाळपईतील काँग्रेस संघटना अधिक मजबूत होईल. तसेच संपूर्ण गोव्यात पक्षाच्या कार्यालाही त्याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, कार्याध्यक्ष एम. के. शेख आणि आमदार ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनीही मिलिंद प्रभू यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे उसगावसह संपूर्ण वाळपई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस संघटनेत नवी ऊर्जा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने जनसंपर्क वाढवून सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मिलिंद प्रभू म्हणाले की, जनतेच्या कल्याणासाठी काम करणे तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्याच्या उद्देशाने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. वाळपई आणि गोव्यातील जनतेच्या अपेक्षा आणि समस्या सोडविण्यासाठी तसेच काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आपण अथकपणे कार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.





