कारापूरवासीयांचे डिचोली मामलेदारांना निवेदन
गांवकारी, दि.१ (प्रतिनिधी)
डिचोली तालुक्यातील कारापूर गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रस्तावित लोढा मेगा प्रकल्पानमुळे त्यांच्या शेती व पारंपरिक हक्कांवर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांबाबत दिलेल्या तक्रारीवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत मामलेदारांकडे पुन्हा पाठपुरावा अर्ज सादर केला आहे.
१३ मार्च २०२६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत ग्रामस्थांनी सांगितले की, सर्वे क्रमांक १४८ व १७६ मधील शेती क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामामुळे पारंपरिक प्रवेशमार्ग अडवण्यात आला आहे. पंचायत, तलाठी व प्रशासनाकडून पाहणी झाली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही सुधारात्मक कारवाई झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.
पारंपरिक वाट अडवली
शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी व देवस्थानात जाण्यासाठी वापरली जाणारी जुनी वाट बांधकामामुळे बंद करण्यात आल्याने शेती कामकाज, ग्रामस्थांची हालचाल व धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश अडचणीत आला आहे.
काजू झाडांची तोड
उपजीविकेचा मुख्य स्रोत असलेल्या अनेक काजू झाडांची शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय व कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय तोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डोंगर कापणी व जमीन बदल
मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी व जमीन सपाटीकरणामुळे मृदा धूप, शेजारील शेतीचे नुकसान तसेच नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
उपजीविकेला धोका
या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असून पारंपरिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
प्रशासनाकडे मागण्या
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
• अडवलेली पारंपरिक वाट तात्काळ खुली करावी
• नव्याने सविस्तर पाहणी करून अहवाल सादर करावा
• सुरू असलेली बांधकामे, डोंगर कापणी व झाडतोड थांबवावी
• जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी
• शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे व हक्कांचे संरक्षण करावे
ग्रामस्थांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून विलंब झाल्यास शेती व पर्यावरणाला दूरगामी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे.





