पाटकर – चोडणकर संघर्षाला प्रभारी जबाबदार !

काँग्रेस हायकमांडच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)

राज्यात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती उद्भवण्यास हायकमांड आणि राज्यात पाठवले जाणारे प्रभारी जबाबदार आहेत. अमित पाटकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून गिरीश चोडणकर गटाने त्यांच्या विरोधात असहकार्याचे धोरण स्वीकारले. या संघर्षात प्रभारींनी हस्तक्षेप करून समेट का घडवून आणला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राज्यात एकीकडे भाजपच्या जुलमी राजवटीपासून लोकांना मुक्तता हवी आहे, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस मात्र अंतर्गत संघर्षात अडकला आहे. ही परिस्थिती दुर्दैवी असल्याचे पक्षातील काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत. लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याऐवजी आणि भाजपच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करण्याऐवजी काँग्रेसचे नेते दिल्लीत आपल्या पक्षातील एकमेकांचे वाभाडे काढण्यात मग्न आहेत. पक्षातील सध्याच्या घडामोडी कार्यकर्ते आणि जनतेसाठी अत्यंत निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
ठाकरे आणि निंबाळकर अपयशी
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या तीन वर्षांत तळागाळातील संघटन उभारणीसाठी ठोस पावले उचलली नाहीत. सर्वांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून यशस्वी प्रयत्न झाले नाहीत. केवळ बैठका घेणे आणि दिल्लीवरून आलेले कार्यक्रम राबविणे इतपतच त्यांची भूमिका मर्यादित राहिली, अशी स्पष्ट टीका स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.
दिल्लीत पक्ष नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर कुणालाही विश्वासात घेतले जात नसल्याची भावना निर्माण झाली आहे. पक्षाचे आमदार आणि खासदारांनाही श्रेष्ठींकडून विचारले जात नसल्यामुळे “नेमके काय चालले आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या एकूण प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. जर फक्त गिरीश चोडणकर यांनाच निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात असतील, तर उर्वरित नेते, कार्यकर्ते, विद्यमान तीन आमदार आणि खासदार यांचे नेतृत्व कौशल्य, योगदान आणि निष्ठा गौण ठरते का? तळागाळात काम करणारे इतर नेते हायकमांडच्या नजरेत का येत नाहीत? भाजपविरोधातील जनतेची नाराजी असूनही काँग्रेसला त्याचा लाभ घेता आलेला नाही. गटबाजी आणि निष्क्रियतेमुळे पक्ष भरकटत चालला आहे.
आज जर काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर व्यक्तिनिष्ठ निर्णय न घेता सामूहिक नेतृत्व आणि तळागाळातील नेते व कार्यकर्त्यांचा सन्मान हीच खरी गरज आहे, असा ठाम सूर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात उमटत आहे.

  • Related Posts

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    बेकायदा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचे अभय – स्वप्नेश शेर्लेकर गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात उद्योजक कमलाप्रसाद यादव यांनी उभारलेले १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम अजून कायदेशीर मान्यता प्राप्त…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper