वाघेरी वन्यजीव क्षेत्र घोषित करण्याचा विश्वजीत राणेंचा प्रस्ताव
गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी)
सत्तरी तालुक्यातील जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आणि पश्चिम घाटाचा महत्वाचा भाग असलेल्या वाघेरी पठार क्षेत्राला वन्यजीव संरक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव वनमंत्री विश्वजीत राणे यांनी मांडला आहे. या क्षेत्राचे संवर्धन करून सिंहांच्या अधिवासाची संकल्पना साकार करण्याची त्यांची इच्छा आहे.
वाघेरीच्या जमिनीच्या व्यवहारांवर राजकीय आणि रिअल इस्टेट क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू असताना, वनमंत्र्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. काही वृत्तांनुसार, वाघेरीची जमीन दिल्लीतील एका बड्या राजकीय नेत्याला विकली गेल्याची चर्चा आहे. मात्र, विरोधकांनी मुद्दाम गैरप्रचार केल्याचा आरोप राणे यांनी यापूर्वीच केला होता. वाघेरी पठार हे खाजगी वनक्षेत्राचा भाग असून, त्याच्या सीमेलाच म्हादई अभयारण्य क्षेत्र आहे. त्या अभयारण्याच्या विस्तारासह वाघेरीचा समावेश वन्यजीव क्षेत्रात करण्याचा विचार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
सिंहांचा अधिवास – नवीन संकल्पना
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश दिला असताना, वनमंत्री राणे यांनी त्याला विरोध केला आहे. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. स्थानिक लोकसुद्धा व्याघ्र क्षेत्राच्या संकल्पनेला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत, वनमंत्री राणे यांनी वाघेरी पठारात सिंहांच्या अधिवासाची संकल्पना सादर केली आहे. त्यांनी या क्षेत्रात सिंह आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे जैवविविधता संवर्धनासह पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.






