स्वप्नेश शेर्लेकर आगे बढो…

स्वप्नेश शेर्लेकर यांचा आवाज हा गोव्यातील लोकशाहीचा आवाज आहे. तो दडपण्याचा प्रयत्न म्हणजे विचारस्वातंत्र्यावर घाला. अशा निर्भीड कार्यकर्त्यांना पाठिंबा देणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.

गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर हे आजच्या काळात निर्भीडतेचे प्रतीक ठरत आहेत. अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांवर आधारित व्हिडिओद्वारे त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नेमकेपणाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मोजक्या शब्दांतून व्यक्त होणारी स्पष्टता आणि राजकीय व्यवस्थेचा केलेला पोलखोल सरकारच्या वर्मी लागतो आहे. हे काम माध्यमांनी करणे अपेक्षित असले तरी, माध्यमे राजकीय दबावाखाली झुकत चालल्याने मुक्त पत्रकारिता आणि सामाजिक कार्यकर्तेच आज लोकशाहीचे खरे रक्षक ठरत आहेत.
स्वप्नेश शेर्लेकर हे मूळचे डिचोली तालुक्यातील मुळगावचे. त्यांचे बालपण आणि शिक्षण वास्को येथे कॉन्वेंट संस्थेत झाले. त्यामुळे सर्वधर्मीय आणि सर्वजातीय समुहांचे संस्कार त्यांच्यावर खोलवर झाले आहेत. अभियांत्रिकी शिक्षण आणि फार्मा कंपनीतील प्रदीर्घ सेवा अनुभव असलेले शेर्लेकर हे केवळ बुद्धिमान नाहीत, तर धार्मिक रितीरिवाजांचा आदर करणारे आणि सामाजिक विषमतेचे चटके सहन करून घडलेले एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत.
भंडारी समाजातून आलेले, शेतकरी-कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे शेर्लेकर यांनी गोमंतभूमीच्या रक्षणासाठी भरपगारी नोकरीचा त्याग करून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. आज ते गोवा फाऊंडेशनसह विविध संस्थांमध्ये संशोधन, कायदेशीर लढे आणि जनजागृतीचे कार्य करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. पण जसे संत-महंत माधुकरीवर जगत होते, तसेच आजही प्रामाणिकपणे समाजासाठी काम करणाऱ्यांना समाज कधीच उपाशी ठेवत नाही. हजारो हात मदतीसाठी पुढे येतात, आणि त्यांना प्रसिद्धीची हाव नसते. वरवर कठोर वाटणारा समाज आतून मात्र सहृदय, संवेदनशील आणि मृदू असतो, हे शेर्लेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना अनुभवातून उमगते.
नवरात्रीच्या काळात व्याघ्रक्षेत्राचे महत्त्व विषद करणाऱ्या शेर्लेकर यांच्या एका व्हिडिओमुळे भाजपची चांगलीच फजिती झाली. त्याचा राग म्हणून करीना शिरोडकर या नव्याने भाजपात दाखल झालेल्या महिला कार्यकर्त्याने त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून लगेच गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांकडून सतत नोटिसा पाठवून शेर्लेकर यांना त्रास दिला गेला.
शेर्लेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली असून, सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की पोलिसांना मोबाईल मागण्याचा अधिकार नाही आणि चौकशीसाठी आवश्यक माहिती संबंधित व्यक्तीकडूनच घ्यावी. यामुळे पोलिसांचा रसभंग झाला.
स्वप्नेश शेर्लेकर यांचा आवाज हा गोव्यातील लोकशाहीचा आवाज आहे. तो दडपण्याचा प्रयत्न म्हणजे विचारस्वातंत्र्यावर घाला. अशा निर्भीड कार्यकर्त्यांना पाठिंबा देणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. गोवा वाचवण्यासाठी उभी राहिलेली ही चळवळ केवळ एका व्यक्तीची नाही, ती संपूर्ण समाजाची आहे. गोंयकारांनी या युवा लढवय्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभे राहून, “स्वप्नेश शेर्लेकर, तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ हैं!” असे ठामपणे म्हणण्याची आज गरज आहे.

  • Related Posts

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    उटाचा मेळावा कारापूरात का नको ?

    मेळावा क्रांती मैदानावर का, कारापूरच्या आंदोलनस्थळी का नाही? हा प्रश्न उटा संघटनेच्या नेतृत्वाला समाजबांधवांनी विचारला पाहिजे. उटा संघटनेचा नियोजित आझाद मैदानावरील मेळावा आता म्हार्दोळ येथील क्रांती मैदानावर होणार आहे. राजकीय…

    You Missed

    13/08/2026 e-paper

    13/08/2026 e-paper

    रोजगार: आभास आणि वास्तव

    रोजगार: आभास आणि वास्तव

    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    12/08/2026 e-paper

    12/08/2026 e-paper

    “आज नाही तर कधीच नाही”

    “आज नाही तर कधीच नाही”