
वसुंधरा दिन विशेष
माझ्या वडिलांना जाऊन एकोणीस वर्षे झालीत. पण त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी अगदी काल घडल्यासारख्या स्पष्टपणे आठवतात. अलीकडे त्यांच्या आठवणीचे अनेक छोटे लेख मी लिहिले आणि अनेक मित्रांशी शेअर केले. अनेक मंडळींनी ते वाचून चांगले अभिप्राय दिले. अनेकांनी अशी खंत व्यक्त केली की ते माझ्या बाबांना भेटू शकले नाहीत. पण एका तरुणाने मात्र मला गंमतीशीर प्रश्न विचारला. तो म्हणाला, “तुमच्या लेखांवरून असे वाटते की तुमचे बाबा कधीच चुकत नसत. पण असे असू शकणार नाही. ते कधी ना कधी चुकले असतीलच ना. तुम्ही त्यांच्या चुका अशाच खुलेपणाने सांगू शकाल का? असा एक मुद्दा सांगाल का, जिथे तुमचे बाबा चुकले होते?”
“अनेक बाबतीत ते चुकले होते. पण त्यांची एक चूक मला सगळ्यात मोठी वाटते, ती म्हणजे त्यांना Law of Entropy माहीत नव्हता,” मी म्हणालो. मी काय म्हणतोय ते त्या तरुणाच्या लक्षात आले नाही. अर्थात मला देखील बाबांची ही चूक खूप उशिरा कळली.
माझे बाबा प्रगतीशील शेतकरी गणले जायचे. त्यांनी त्यांच्या शेतीत आधुनिकता आणली होती. म्हणजे पन्नास वर्षापूर्वी त्यांनी पारंपरिक बैलाच्या नांगराऐवजी जापनीज मॉडेलच्या पाॅवरटीलरचा उपयोग सुरू केला होता. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा प्रमाणित उपयोग करून किफायतशीर शेती केली होती. वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची त्यांना उमेद होती. त्यांनी १९८० च्या पूर्वीच यशस्वी रेशीम उद्योग केला होता. ऊस, बटाटे ही कोकणात फारशी घेतली न जाणारी पिके त्यांनी आमच्या बागेत यशस्वी केली होती. त्यांना १९८४ सालचा महाराष्ट्र सरकार तर्फे दिला जाणारा शेतीनिष्ठ पुरस्कारदेखील मिळाला होता. त्यांच्या शेती व्यवसायावरच आमच्या कुटूंबाला त्या काळात चांगले जीवन जगता येत होते. माझे वैद्यकीय शिक्षण, बाबांचे आजारपण (बायपास सर्जरी वगैरे खर्च) त्यांच्या शेतीतील मिळकतीतून पार पडले होते.
हे सगळे सामान्यपणे योग्य वाटणारे होते. कौतुक वाटावे असे होते. मलाही त्याचा अभिमान वाटे.
पण माझ्या या समजाला पहिला हादरा बसला तो ऑरगॅनिक फार्मिंगवरचे क्लाॅड अल्वारीस यांचे पुस्तक चाळताना. ते पुस्तक चाळताना मला एक परिच्छेद मिळाला. तो परिच्छेद असा होता- ‘अमेरिकेतील एक शेतकरी आज ४० जणांना अन्न आणि कापड पोचवत आहे. दुसरीकडे भात पिकवणारा चिनी शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून स्वतःचे पोटदेखील भरू शकत नाही. कुशलतेतला हा केवढा मोठा फरक?’
हे विधान मान्य होणारेच होते. त्यात धक्कादायक काहीच नव्हते. धक्का बसला तो पुढच्या वाक्याने. पुढचे वाक्य होते- ‘पण बारकाईने आणि तुलनात्मक दृष्टीने बघितले तर अमेरिकन शेतकर्यापेक्षा चिनी शेतकरी बरा.’ मला वाटले की मी चुकीचे वाचले किंवा काहीतरी प्रिंटींग मिस्टेक असावी. मी पुढे वाचू लागलो. त्या परिच्छेदातील शेवटचे वाक्य सगळ्या गोष्टी आकड्यात मांडत होते- ‘५० युनिट उत्पादित ऊर्जेसाठी अमेरिकन शेतकरी २५० युनिट ऊर्जा खर्च करतो.’ म्हणजे जास्त ऊर्जा खर्च करून कमी ऊर्जा मिळवणे! आणि- ‘चिनी शेतकरी ५० युनिट ऊर्जेच्या उत्पादनासाठी १ युनिट ऊर्जा खर्च करीत असतो. याचा सरळ अर्थ हा की पूर्वेचा शेतकरी ५००० टक्के कुशलतेने काम करत आहे. अमेरिकन शेतकरी भरपूर सोय असून देखील २० टक्के कुशलतेने काम करत आहे!’
पण मला समजेना की असे असेल तर अमेरिकन शेतकरी तोट्यातील शेती करतो असे म्हणावे लागेल. पण कोण शहाणा माणूस तोट्यातील शेती करेल? आणि कोणती व्यवस्था हा मूर्खपणाचा व्यवहार करत राहू देईल?
पण हे आपल्या पुस्तकात मांडणारी व्यक्ती कोणी भाबडी व्यक्ती नव्हे, की शेंड्या लावणारी व्यक्ती नव्हे. तिने आपल्या पुस्तकात ज्या अर्थी हे विधान केलेय त्या अर्थी ते सत्य असले पाहिजे. हे कोडे सोडवायचे कसे हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ तसाच चालू राहिला.
तो चालू असतानाच, महाराष्ट्रात ज्यांचा द्राक्ष माऊली म्हणून गौरव केला गेला होता, त्या प्रा. श्रीपाद दाभोलकर यांचे ‘Plenty for All’ हे पुस्तक योगायोगाने मला वाचायला मिळाले. त्यात ते विनमय हा energy equivalent ने व्हायला हवा असे सुचवत होते.
मला ते नवीन होते. कारण त्या आधी मी विनिमय हा labour equivalent ने व्हायला हवा असे मानत होतो. म्हणजे कोणत्याही व्यवहारात दोन्ही बाजूला समान श्रम असले पाहिजेत असे मला वाटत होते.
मुळात वस्तूची किंमत ही त्यात घातलेल्या श्रमांची किंमत असते. समजा मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही नदीतले हवे तितके पाणी न्या आणि मला गॅलनमागे दहा रुपये द्या, तर तुम्ही मला द्याल का? अजिबात नाही. तुम्ही उलट मला विचाराल की नदी काय तुझ्या बापाची आहे का? याच्या उलट तुम्हाला जिथे पाणी हवे आहे, तिथे मी तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे पाणी नेऊन दिले तर मात्र तुम्ही मला पैसे द्याल. बरोबर ना? काय फरक आहे नदीतील पाणी आणि तुमच्या ठिकाणी आणून दिलेले पाणी यात? तुम्हाला हवे तिथे पाणी आणून देण्यात मी श्रम घातलेले असतील. म्हणजे मुल्य त्या पाण्याला नाही. त्यात घातलेल्या श्रमाला आहे. म्हणजे किंमत ही श्रमांची असते. आणि जेव्हा कोणताही देवाणघेवाणीचा व्यवहार होतो तेव्हा दोन्ही बाजूला समान श्रम असणे आवश्यक असते.
पण श्रीपाद दाभोलकर देवाणघेवाणीसाठी वेगळाच निकष सांगत होते. ते दोन्ही बाजूला समान ऊर्जा असायला हवी असे म्हणत होते. म्हणजे मी कोणत्याही रूपातील १ युनिट ऊर्जा विकत घेत असेन तर मी दुसर्या रूपातील १ युनिट ऊर्जा द्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते.
मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचले तेव्हा समजले नाही. मला वाटत होते की दोन्ही बाजूला सारखे श्रम असतील तर ऊर्जा पण सारखीच असेल. बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले की दगडी कोळशाचा शोध लागेपर्यंत मानवी श्रम आणि बैल, घोडे वगैरेंचे श्रम म्हणजे ऊर्जा होती. पण दगडी कोळशाच्या शोधानंतर ऊर्जा व श्रम यात तेच नाते राहिले नाही.
त्यापूर्वी माणूस आणि त्याचे बैल किंवा रेडा यासारखे पाळीव प्राणी यांची ऊर्जा कामात येई. आणि ती माणसाला आणि त्याच्या पाळीव प्राण्याला अन्न खाऊन परत मिळवावी लागे. पण दगडी कोळशाचा शोध लागल्यानंतर दगडी कोळसा खाणीतून बाहेर काढल्यावर तो काढण्यासाठी लागणार्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा मिळू लागली. ही ऊर्जा लाखो वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीने साठवून ठेवलेली ऊर्जा होती.
त्यामुळे ‘क्ष’ कॅलरी मानवी ऊर्जा उत्खननासाठी वापरल्यावर त्यापेक्षा जास्त म्हणजे ‘क्ष+ य’ इतकी ऊर्जा मिळू लागली.
ही जादा मिळणारी ऊर्जा मानवाच्या श्रमांनी तयार झालेली नाही. ती तिजोरीत ठेवल्यासारखी पृथ्वीच्या पोटात पुरलेली होती. जशी तिजोरीत ठेवलेली संपत्ती मर्यादित असते तसे जीवाश्म इंधन (दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल वगैरे) मर्यादित आहे. ते आपल्याला फुकटचे मिळाल्याने त्याच्या ऊर्जेचा हिशेब आपण विचारात घेत नाही. आपण जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करतो तेव्हा या जीवाश्म इंधनातून जितकी ऊर्जा घेतली तितकीच ऊर्जा धान्याच्या रुपात मिळवली का याचा विचार करत नाही. आणि हिशेब दाखवतो की ५० युनिट ऊर्जेचे धान्य निर्माण करण्यासाठी २५० युनिट ऊर्जा खर्च करतो. ही ऊर्जा ट्रॅक्टर मधील डिझेल, खते व कीटकनाशके बनवताना खर्च होणारी वीज वगैरेत खर्च झालेली असते.
एखाद्या तरुणाला त्याच्या परसात गुप्तधन सापडावे आणि त्याने ते उधळेपणाने खर्च करावे तसे काहीसे हे होत आहे.
दाभोलकरांचे पुस्तक वाचताना पुढे मला आणखी एक शब्द मिळाला, तो म्हणजे Entropy. हा शब्द या पूर्वी ऐकल्याचे आठवेना. त्यात पुढे म्हटले होते की एंट्रोपीचा नियम म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम. पहिला नियम म्हणजे ‘ऊर्जा अक्षयतेचा नियम.’ ऊर्जा अक्षयतेचा नियम मला आठवत होता. त्या नियमानुसार विश्वातील एकूण वस्तुमान आणि ऊर्जा कायम असते. ती निर्माण करता येत नाहीत की नष्टही करता येत नाहीत. पण एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्या प्रकारच्या उर्जेत रूपांतर होते. आणि ऊर्जेचे रूपांतर वस्तुमानात आणि वस्तुमानाचे उर्जेत होऊ शकते.
मी जरा सावकाशपणे ‘Law of Entropy’ वाचायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आले की एंट्रोपी म्हणजे ऊर्जेचे रूपांतर वापरता न येण्यासारख्या रुपात होणे. जसजशी ऊर्जा खराब होत जाते तसतशी एंट्रोपी वाढते. मला हे शाळेत शिकलेले आठवले की कोणत्याही यंत्रात जेव्हढी ऊर्जा घातली जाते, त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा त्यातून निर्माण होते. म्हणजे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसर्या प्रकारात रूपांतर होताना काही ऊर्जा वाया जाते. या वाया जाणाऱ्या ऊर्जाचे मोजमाप म्हणजे एंट्रोपी. एंट्रोपी म्हणजे काय हे समजून घेताना मला सुचले की एंट्रोपीचा नियम म्हणजे ‘ऊर्जा भ्रष्टतेचा नियम!’
सर्वात कार्यक्षम (efficient) यंत्र किंवा व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था असेल ज्यात एंट्रोपी कमीतकमी असेल.
पण याचा उपयोग काय? दाभोलकर हे का सांगत आहेत? ऑरगॅनिक शेतीचा एंट्रोपीशी संबंध काय? असे प्रश्न माझ्या मनात डोकावले. आणि त्याचे उत्तर मला त्याच्या पुढच्याच परिच्छेदात मिळाले.
आपण शेती करतो म्हणजे नक्की काय करतो? आपल्या जमिनीत धान्य, फळे, कंदमुळे वगैरे उत्पन्न करतो. पण ती उत्पन्न होतात कशी? क्षार आणि पाणी ती जमिनीतून घेतात. पण महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे पिष्टमय पदार्थ किवा साखर. तसेच प्रथिने आणि तेले! हे बनतात कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी यांच्या पासून सूर्याच्या प्रकाशात. प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथसीस ही ती प्रक्रिया. म्हणजे आपल्या शेतीतील उत्पादनात जी काही ऊर्जा असते, ती सगळी सूर्य प्रकाशातून घेतलेली असते. (एक चौरस फूटात पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून हिरवी पाने एका दिवसात ३ ग्राम सुके वजन तयार करतात.) आपल्या जमिनीवर पडणार्या सूर्यप्रकाशापासून आपण जेव्हढी सौर ऊर्जा गोळा करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा आपण खर्च केली तर तो तोट्याचा धंदा होईल. पण सध्याची शेती हा तोट्याचा धंदा करते. मग ती लोकांना तोट्याची का वाटत नाही? कारण जी जास्तीची ऊर्जा खर्च केली जाते ती जीवाश्म इंधनात साठवलेली. त्यामुळे आपल्या शेतातील एंट्रोपी वाढते. आणि जगाची सगळीच अर्थव्यवस्था अशीच चालत असल्यामुळे संपूर्ण जगाची एंट्रोपी वाढते आहे. एंट्रोपी वाढवणे म्हणजे वाया घालवणे, सुसंघटितपणाकडून गोंधळाकडे जाणे. हे समजून घ्यायला आपण ग्लोबल वॉर्मिंगचे उदाहरण घेऊ. ग्लोबल वॉर्मिंग का होते? हवेत कार्बन डाय ऑक्साईड वाढल्यामुळे. तो का वाढतो कारण आपली झाडे जितका कार्बन डाय ऑक्साईड पचवू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित केल्यामुळे.
झाडाची हिरवी पाने ही निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी एंट्रोपी कमी करते. सूर्याकडून दररोज येणारी ऊर्जा त्याच दिवशी आसमंतात परत जाते. ती पुन्हा येणारी नाही. पण पाने काय करतात? ती ऊर्जा पकडतात आणि आपल्या शरीरात साठवतात. त्यामुळे धान्य, फळे वगैरेंतून आपल्याला मिळणार्या कॅलरीज या मूळात सूर्याकडून आलेल्या असतात. लाकडात साठलेली आग ही सूर्याकडून आलेली असते. वनस्पतींनी सूर्याची साठवलेली ऊर्जा गाय, हरीण सारख्या शाकाहारी प्राण्यांना मिळते. त्यांच्यापासून वाघ, सिंह सारख्या मांसाहारी प्राण्यांना मिळते.
निसर्गाच्या एंट्रोपी कमी करण्याच्या यंत्रणेचा उपयोग करून घेण्याऐवजी माणूस अधिक एंट्रोपी निर्माण करतो आहे.
दाभोलकर यांचा निष्कर्ष आहे की माणसाने एंट्रोपी कमी करण्याच्या निसर्गाच्या यंत्रणेचा अभ्यास केला आणि त्याचे सूत्र बनवून शेती केली तर तो केवळ दहा गुंठ्यात पाच माणसाना समृद्ध जीवन जगता येईल असे उत्पन्न मिळवू शकतो. (श्रीपाद दाभोलकर यांची ‘केल्याने होत आहे रे’ आणि ‘विपुलाच सृष्टी’ ही दोन मराठी पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत.) हे माझ्या वडिलांना माहीत नव्हते. त्यामुळे ते जरी प्रामाणिकपणे शेती करत असले तरी जगात एंट्रोपी वाढायला हातभार लावत होते!
…..
– डॉ. रुपेश पाटकर