
इंडि आघाडीच्या एकजुटीचा धुव्वा
पणजी,दि.२२(प्रतिनिधी)
लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र वावरलेल्या विरोधकांच्या एकजुटीचा धुव्वा उडाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेले विजय सरदेसाई यांना विरोधकांनीच एकाकी सोडल्याने ते चक्रव्युहात सापडले आहेत. या घटनेनंतर हातावर मोजता येणाऱ्या सात विरोधकांत अजिबात एकवाक्यता नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आमदार वेन्झी व्हीएगश ठरले कळीचा मुद्दा
आपचे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगश यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी तुलना करून पहिला धक्का दिला. या वक्तव्यावर आरजीपी, काँग्रेसने आपल्या प्रतिक्रिया दिल्या तरिही त्याकडे कुणीही गांभीर्याने पाहीले नाही. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिलेली तिखट प्रतिक्रिया मात्र त्यांच्या अंगलट आली. भाऊसाहेब बांदोडकर आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या महाराष्ट्र प्रेमाकडे अंगुलीनिर्देश करून विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या अस्मितेला हात घातला. भाजपने तात्काळ भाऊसाहेबांच्या अपमानाचा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे रेटून सरदेसाई यांना अडचणीत आणले. शेवटी विजय सरदेसाई यांना स्पष्टीकरण देऊन भाऊसाहेब बांदोडकरांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही,असे सांगावे लागले.
वेन्झी आणि आरजीपीची टीका
आपचे आमदार वेन्झी व्हीएगश आणि आरजीपी पक्षाने आमदार विजय सरदेसाई यांच्यावर तोंडसुख घेतले. विजय सरदेसाई हे स्वतःला सर्वांत जास्त शहाणे समजतात. भाजपला सत्तेवर आणण्यात आणि नगर नियोजन खात्यात दुरूस्ती करून जमिनीचे रूपांतरण करण्यात तेच जबाबदार आहेत,असा टोला वेन्झी व्हीएगश यांनी हाणला. आरजीपीनेही २०१७ मध्ये भाजपला सत्तेवर येण्यासाठी मदत केलेले विजय सरदेसाई हे केवळ स्वतःच्या राजकीय हीतासाठीच भाजपवर टीका करून विरोधी गटाचे नेतृत्व करण्याचा खटाटोप करत असल्याचा आरोप केला.
सातजणांतही एकमत नाही
विरोधात फक्त सात आमदार आहेत आणि त्यांच्यातही एकमत नाही, हे पुन्हा एकदा या प्रकरणातून जनतेपुढे आले आहे. विरोधी काँग्रेस पक्षाचे मौन हा कळीचा मुद्दा ठरला असताना आपचे आमदार वेन्झी व्हीएगश यांची अचानक मुख्यमंत्र्यांची स्तूती आणि त्यात आता विजय सरदेसाई यांच्या वक्तव्यानंतर विरोधकच त्यांच्यावर तुटून पडण्याचा प्रकार भाजपच्या चांगलाच पथ्यावर पडल्याची चर्चा सुरू आहे.