
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) –
राज्यातील आरजीपी वगळता अन्य सर्वच पक्षांचे सत्ताधारी भाजपकडे सेंटिंग आहे. विरोधकांच्या आघाडीत सामील होत नाही म्हणून आरजीपीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांचे आता पितळ उघड झाले आहे. हे दिल्लीवाले पक्ष गोव्याला संपवणार आहेत आणि त्यामुळेच गोंयकारांनी आरजीपीवर विश्वास ठेवावा आणि गोवा सांभाळण्यासाठी आरजीपीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केले.
आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. यावेळी आमदार विरेश बोरकर, सचिव विश्वेष नाईक आणि खजिनदार अजय खोलकर हजर होते. लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीत सामील होत नसल्यामुळे अनेकांनी आरजीपीच्या कार्यकर्त्यांची थट्टा केली, त्यांना अपमानित केले, भाजपला सहकार्य करत असल्याचा आरोप केला परंतु प्रामाणिक क्रांतीकारकांनी हे सगळे सहन केले. आज इंडी आघाडीचे घटक आहेत कुठे, असा सवाल मनोज परब यांनी केला. काँग्रेसची सत्ता कर्नाटकात असल्यामुळे त्यांचे तोंड बंद आहे. आम आदमी पार्टी आता काँग्रेसला अविश्वासार्ह म्हणत आहे. हे सगळे पक्ष दिल्लीवाल्यांचे आहेत आणि दिल्लीवाल्यांनी आत्ताच गोव्यात काय परिस्थिती निर्माण केली आहे हे सगळी जनता पाहत आहे. गोव्याचे हित सांभाळण्यासाठी प्रादेशिक पक्षच हवा आणि गोंयकारांनी त्यासाठी आरजीपी पक्षावर विश्वास ठेवून या पक्षामागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन मनोज परब यांनी केले.
जमिनींचा सौदा करणारे पक्ष
राज्यात सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे जमिनीचे संरक्षण. यासंबंधीचे विधेयक आरजीपीने विधानसभेत मांडले त्यावेळी एकाही विरोधी पक्षाने त्याला पाठिंबा दिला नाही. दिल्लीवाल्यांच्या राजकीय पक्षाचे नेते गोव्यातील नेत्यांना आपले जमिनींचे व्यवहार करण्यासाठीच वापरतात, अशी टीका आमदार विरेश बोरकर यांनी केली. कुळ-मुंडकारांचे विषय प्रलंबित आहेत. जमीन संरक्षणासाठी कायदे आणले जात नाहीत तर दिल्लीवाल्यांना जमिनींचे व्यवहार करण्यासाठी कायदे आणले जातात, असा आरोपही त्यांनी केला. जमीन संरक्षण, बेरोजगारी, महिलांचे संरक्षण, कायदा सुव्यवस्था आदी सर्वच पातळीवर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशी टीकाही त्यांनी केली.
आरजीपीची सदस्य नोंदणी सुरू
गोंयकारांनी पूर्णपणे आता आरजीपीच्या पाठीमागे ठामपणे राहण्याची गरज आहे. पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे. बहुसंख्य गोंयकारांनी या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून आता गोवा वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अजय खोलकर यांनी केले.