विश्वजीतांकडून भाजप हायजॅक

सरकार आणि पक्षाला असहाय्य बनवून आपले वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या विश्वजीत राणे यांनी भाजपला हायजॅक केले आहे, असे म्हणणे अतिशोयुक्ती ठरणार काय ?

पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणारा भाजप पक्ष किमान
गोव्यात तरी या अवस्थेला पोहचेल,असे कधीच वाटले नव्हते. सत्तेसाठी बराच काळ भाजपला वाट पाहावी लागली परंतु पक्षाने कधीच सत्तेसाठी शॉटकर्ट स्वीकारला नाही. पण सत्तेत आल्यानंतर आता पक्षाला सत्तेची अशी काही चटक लागली की पक्षाची तत्वे, विचारसरणी, संस्कार आदी सर्वकाही खुंटीला टांगण्यात आलेली पाहायला मिळतात. राजकीय पक्षाचे अंतीम ध्येय हे सत्ताच असते आणि एनकेन सत्ता मिळवण्यातच पक्षाच्या यशाचे गोम असते. पण कमरेचे सोडून अगदीच डोक्याला बांधण्यापर्यंत जर एखाद्या पक्षाची मजल गेली तर तो अतिरेक जनतेला सहन होणे शक्य नाही. बरे, जनतेला सहन झाला नाही तरिही त्यांना त्याचे काहीही देणेघेणे नाही कारण जनतेने पक्षाच्या रागाने विरोधी पक्षाला निवडून आणले तरी त्यांचे आमदार चोरून पुन्हा सत्ता काबीज करण्यात भाजपने यश मिळवून जनतेच्या प्रतिशोधाचाही वचपा काढून दाखवला आहे. आता अशा या स्थितीत जनतेसमोर पर्याय राहतोच काय,असाही प्रश्न आहे. शेवटी या सगळ्या राजकीय अनैतिकतेच्या गोष्टी या आपल्या लोकशाहीच्या मुळालाच हादरा देणाऱ्या ठरत असल्याने त्या देशासाठी उचित नाही,असेच म्हणावे लागेल.
सरकारात दोन क्रमांकाच्या मंत्रीपदावर असलेले विश्वजीत राणे जेव्हा पुढील अडीच वर्षांत २२ हजार नोकऱ्या तयार झाल्या नाहीत तर सरकारची गरज नाही. जनतेने बिनधास्त सत्ताबदल करावा,असे आवाहन करतात त्यातून नेमके काय समजावे. ही स्टंटबाजी असेल तर मग सत्तरीच्या जनतेला ते मुर्ख बनवत आहेत आणि ते खरोखरच गंभीर आहेत तर भाजपसाठी ते अधिक चिंतेचा विषय ठरणार आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाला यापूर्वीच विश्वजीत राणेंनी आपली नापसंती दर्शवली आहे. कदाचित यामुळेच आयोगामार्फत अद्यापही मोठी भरती होऊ शकलेली नाही. विश्वजीत राणेंकडील नोकरभरतीत फक्त सत्तरीलाच कसे झुकते माप मिळते हे राज्यभरातील बेकार तरूणांनी पाहीले आणि अनुभवलेही आहे. आता त्यांनी २२ हजार नोकऱ्या या राज्यभरातील बेरोजगारांसाठी गरजेच्या असल्याचे सांगून सर्वंच बेरोजगारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
राज्यात भूरूपांतरावरून प्रचंड असंतोष पसरला आहे. ठिकठिकाणी लोकांचा उठाव सुरू आहे. खाजगी वनक्षेत्राचे दरवाजे रिअल इस्टेटवाल्यांसाठी खुले करण्याच्या प्रकरणांतही मोठ्या गोष्टी सुरू आहेत. हे सगळे विषय पक्षासाठी डोकेदुखी ठरले असतानाच आता रोजगाराच्या या विषयावरून विश्वजीत राणे यांनी केलेले विधान पक्षासाठी मारक ठरू शकणारे आहे. २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर केवळ ७ वर्षांत त्यांनी आपल्या मोहीनीने भाजप श्रेष्ठींना असे काही मुठीत घेतले आहे की त्यांना सगळे काही पक्षात माफ आहे,असेच वेगवेगळ्या प्रकारांवरून दिसून येते. भाजप आपल्या मुळ तत्वांपासून अजिबात हलणार नाही याची काळजी घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही विश्वजीत राणेंनी आपल्या कवेत घेतल्याची चर्चा सुरू आहे, अन्यथा ह्या राज्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याबाबत संघाने सरकारचे वेळीच कान पिळले असते. एक गोष्ट मात्र खरी की संघसंस्काराची पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याकडे सरकारचे नेतृत्व जाऊ शकत नाही आणि तिथे केवळ डॉ. प्रमोद सावंत हे एकमेव पात्र उमेदवार ठरतात. हे जाणून असल्यामुळे संघाची कृपादृष्टी मिळवण्यासाठीही आटोकाट प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. सरकार आणि पक्षाला असहाय्य बनवून आपले वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या विश्वजीत राणे यांनी भाजपला हायजॅक केले आहे, असे म्हणणे अतिशोयुक्ती ठरणार काय ?

  • Related Posts

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    किती म्हणून सहन करणार ?

    आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे, प्रशासनासाठीही आणि समाजासाठीही. अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि त्याची किंमत सामान्य जनतेलाच आपल्या आरोग्याने आणि जीवाने मोजावी लागेल. दाबोळी विधानसभा…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    किती म्हणून सहन करणार ?