१३ रोजी दिल्लीत जंतरमंतरवर तर पणजीत आझाद मैदानावर निदर्शने
गांवकारी,दि.१०(प्रतिनिधी)
कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या लढ्याला सोमवार, १३ जुलै रोजी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या निमित्ताने कारापूरवासीयांनी “चलो दिल्ली”चा नारा देत जंतरमंतर मैदानावर एक दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्याला पाठींबा देण्यासाठी इनफ इज इनफ, गोवा तर्फे पणजीतील आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता गोमंतकीयांना एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत इनफ इज इनफ, गोवाचे प्रवक्ते स्वप्नेश शेर्लेकर, गोविंद शिरोडकर आणि देविदास आमोणकर यांनी ही माहिती दिली. कारापूर येथे साडेचार लाख चौ.मी. जागेत पंचतारांकित प्रकल्प उभारला जात असून, त्यासाठी सरकारकडून कायदे व नियम वाकवून परवाने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कारापूर गावाला धोका निर्माण होणार असल्याने स्थानिकांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नेता आंदोलनकर्त्यांच्या भेटीला आला नाही. विरोधी पक्षातील दोन आमदारही आंदोलनस्थळी पोहोचले नाहीत. कंपनीचे प्रतिनिधी चर्चा करून गेले, मात्र प्रकल्प रद्द झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार कारापूरवासीयांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारचे लक्ष वेधणार
दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्ताने कारापूरच्या या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. प्रकल्प नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी विक्री केलेल्या जमिनीत उभा राहत आहे. जमिनीच्या मालकीपासून ते परवान्यांपर्यंत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याच प्रकल्पाच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्याविरोधात कंपनीने मुंबई कोर्टात बदनामीचा खटला दाखल केला आहे. इनफ इज इनफ, गोवाचे निमंत्रक निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनीही या प्रकल्पातील कायदेशीर त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. तरीदेखील सरकार प्रकल्पाच्या मागे ठामपणे उभे असल्याने कारापूरवासीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हम तुम्हारे साथ हैं!
गोव्याचे पर्यावरण आणि भविष्य जपण्यासाठी विविध सामाजिक चळवळी सुरू आहेत. कारापूरवासीयांचा हा लढा गोव्याच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याने सर्व गोमंतकीयांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठींबा देणे आवश्यक आहे. दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कारापूरवासीयांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी १३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता पणजी आझाद मैदानावर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गोमंतकीयाने या चळवळीत सहभाग नोंदवून गोवा सांभाळण्याच्या लढ्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.





