राज्य सरकारने फक्त इव्हेंटवर भर न देता जनजागृतीवर लक्ष केंद्रित केल्यास लोक सावध राहण्यास मदत होईल.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यात अल नीनो या वातावरणीय बदलाचे संकेतही स्पष्ट झाले आहेत. या बदलाचे परिणाम संपूर्ण जगावर जाणवणार असले तरी भारतावर त्याचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात. अभ्यासकांच्या मते, १४४ वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होत असून पुढील दोन ते तीन वर्षे त्याचे परिणाम सातत्याने जाणवतील.
एप्रिलच्या उन्हाळ्यात पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे झालेली हानी आपण पाहिलीच. आज बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने सर्वांचीच धावपळ उडाली आणि तब्बल ९ लोकांचा मृत्यू झाला. एका शहरात १११ मिमी पावसाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी गोव्यातील सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली, तर शेजारील सिंधुदुर्गातील सावंतवाडीत चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.
गोव्यात वेधशाळेतर्फे सतत यलो अलर्ट दिला जात आहे. वातावरण ढगाळ असून उष्णतेचे प्रमाणही वाढले आहे. जिल्हाधिकारी आणि आरोग्य खात्याने हीट वेव्ह बाबत सावधगिरीचे इशारे दिले आहेत. मात्र, सरकारने लोकांना अल नीनोच्या संभाव्य परिणामांबाबत अधिक जागरूक करणे गरजेचे आहे. वेधशाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गावोगावी जाऊन जनजागृती करणे, उपाययोजना सांगणे आणि नेमकी काळजी कशी घ्यावी हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
अल नीनो ही पॅसिफिक महासागरातील हवामानातील असामान्य घटना असून तिचा परिणाम मान्सूनवर होतो. पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाचे संकट निर्माण होते, तर काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवते. पर्यावरणीय परिणामांमध्ये जंगलातील आगी, जैवविविधतेला धोका, शेतीतील उत्पादन घट, पाण्याच्या स्रोतांवर ताण, उष्णतेच्या लाटा, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम आणि अन्नधान्याच्या किंमतीत वाढ यांचा समावेश होतो.
या पार्श्वभूमीवर लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे, शेतीत पाणी बचतीच्या तंत्रांचा अवलंब करणे, स्थानिक पिकांना प्राधान्य देणे आणि वृक्षारोपण वाढवणे ही उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रशासनाने जलसंधारण प्रकल्प, सिंचन व्यवस्था आणि जनजागृती मोहिमा राबवणे गरजेचे आहे.
अल नीनो हा नैसर्गिक घटक असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेले वातावरणीय बदल त्याचे परिणाम अधिक तीव्र करतात. त्यामुळे शाश्वत विकास, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी हीच दुष्काळाच्या संकटावर मात करण्याची खरी गुरुकिल्ली आहे. राज्य सरकारने फक्त इव्हेंटवर भर न देता जनजागृतीवर लक्ष केंद्रित केल्यास लोक सावध राहण्यास मदत होईल.







