एकीकडे सेंट फ्रान्सिस झेवियरला धर्मांतर आणि छळाच्या विषयांवरून दोष द्यायचा आणि जुने गोवेतील शवदर्शन सोहळ्यानिमित्त कोट्यवधींची कंत्राटे काढून त्यातून कमिशन खायचे ही भाजपची नीतीच बनली आहे.
भाजप सध्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर जे राजकारण करत आहे ते अत्यंत धोकादायक ठरण्याच्या स्थितीत आहे. पक्ष, सरकार आणि भाजप संलग्न विविध संघटना सक्रियपणे काम करत आहेत. देशात पहिल्यांदाच सत्तेत असलेला सरकारी पक्ष विरोधकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी आणि पक्षीय पातळीवर अशिल आणि प्रतिवादी या दोन्ही भूमिकांतून हा पक्ष एकाच वेळी काम करत आहे. कारण विरोधी बाजूचे महत्त्व खऱ्या विरोधकांना प्राप्त होता कामा नये.
गोव्यात सरकार पुरस्कृत परशुराम जयंती उत्सवात गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी केलेले विधान हे पूर्वनियोजित नसावे असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी गोव्यातील लोकांच्या मनातील श्रद्धा ही गौतम खट्टर यांना माहित असणारच, कारण ते पत्रकारही आहेत. मग हे वक्तव्य त्यांनी का केले? अल्पसंख्याक समाजात, विशेषतः ख्रिस्ती समाजात असंतोष पसरवून या समाजाला जमीन, पर्यावरण तसेच अन्य विषयांपासून दूर लोटण्यासाठीच ही रणनिती आखली गेली असावी.
इनफ इज इनफ ही लोकचळवळ विस्तारत आहे. या लोकचळवळीच्या मागे विशेषतः गोव्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती समाज एकवटत आहे. ही गोष्ट भाजपच्या धुरीणांना चांगलीच माहित असल्यामुळे या चळवळीपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरचा हा पत्ता वापरला. यातून ख्रिस्ती समाज या विषयावर एकवटला तर हिंदू समाजाला परशुरामाच्या नावाने एकत्र आणण्याचाही छुपा डाव साध्य करण्याची संधी या प्रवृत्तींना मिळाली.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री गौतम खट्टर यांच्यावर कठोर कारवाईची वक्तव्ये करतात, तर त्यांच्याच पक्षाचे नेते सोशल मीडियावर उघडपणे खट्टर यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. सरकार आणि सरकारी आमदार, मंत्री खट्टर यांचा निषेध करत आहेत, तर पक्षाचे नेते आणि पदाधिकारी खट्टर यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत. भाजपचा हा डबल स्टॅंडर्ड राजकीय डाव विरोधकांच्या लक्षात आला असला तरी त्याला तेवढ्याच ताकदीने परतवून लावण्याची पात्रता विरोधकांत नाही.
ख्रिस्ती समाजातील विवेकवादी लोकांना हा डाव समजला आहे, परंतु आपल्याच धर्मातील लोकांना तो पटवून देण्यास ते असमर्थ ठरले आहेत. बाकी सरकार किंवा सरकारी पक्षाकडून व्यवस्थित पद्धतीने हा विषय अधिकाधिक पेटवून ठेवण्यासाठी चालाखीने डाव टाकले जात आहेत आणि ख्रिस्ती समाज या डावाला बळी पडत आहे, असेही चित्र दिसते.
यापूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी अश्लाघ्य, बदनामीकारक आणि अत्यंत खालच्या स्तरावरील टीका केली जात होती. महात्मा गांधी यांचे समर्थक असेच तुटून पडत होते. आजच्या घडीला महात्मा गांधी यांच्यावर कितीही आगपाखड किंवा चिखलफेक केली तरी काहीच फरक पडत नाही, कारण महात्मा गांधी यांचे थोरपण अजिबात कमी झालेले नाही, किंबहुना ते अधिकच वाढत चालले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना शेवटी त्यांच्या चरणाशीच माथे टेकवावे लागते.
आता महात्मा गांधींवरील टीकेने भावना दुखावण्याचे दिवस संपल्यानंतर या लोकांनी देवांना आणि धार्मिक, ऐतिहासिक प्रतिमांना आपले लक्ष्य बनवले आहे. ख्रिस्ती समाजातील राजकीय नेत्यांच्या धर्मनिष्ठेचीही परीक्षा भाजप घेत आहे. हे लोक धर्मनिष्ठेसाठी सत्तेवर पाणी सोडायला तयार होतात काय, याचीही परीक्षा पाहिली जात आहे. शेवटी सत्तेपुढे काहीच शहाणपण नाही हे लक्षात आलेले अनेक ख्रिस्ती नेते सेंट फ्रान्सिस झेवियर प्रकरणी गौतम खट्टरचा निषेध करत असले तरी हा सगळा प्रकार नकळतपणे घडवून आणलेल्या भाजपला दोष देण्यास मात्र तयार नाहीत.
हा विषय जेवढे दिवस धगधगत राहील तेवढाच भाजपला त्याचा फायदा होणार आहे. एकीकडे सेंट फ्रान्सिस झेवियरला धर्मांतर आणि छळाच्या विषयांवरून दोष द्यायचा आणि जुने गोवेतील शवदर्शन सोहळ्यानिमित्त कोट्यवधींची कंत्राटे काढून त्यातून कमिशन खायचे ही भाजपची नीतीच बनली आहे. लोक काय म्हणतील किंवा जनता काय विचार करेल याचे त्यांना काहीच पडलेले नाही. जनतेच्या विचारांच्या पलीकडे आता या पक्षाने झेप घेतली आहे. ही झेप या पक्षाला उंचावर नेईल की उंचावरून खाली पाडेल हे काळच ठरवेल.







