केस्तांव दी कोफुसांव


पक्षात काहीही झाले तरी सत्तेला कुणीही स्पर्श करू शकणार नाही,असा समज केंद्रीय नेतृत्वाचा असेल तर तो फोल ठरण्यास अजिबात वेळ लागणार नाही हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.


राज्य विधानसभेतल्या ४० आमदारांपैकी ३३ आमदारांचे पाठबळ असलेल्या सरकारला आपल्या स्थिरतेबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ येणे यातच सरकारात सगळे काही आलबेल नाही हे स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावरून बदनामी हा काही असंतुष्टांचा डाव आहे. विरोधकांतील काही नेते सरकारातील आमदारांना डिवचून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत,असे अनेक युक्तीवाद करून शेवटी सरकारातील अकराही मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचा दावा भाजपने पत्रकार परिषदेतून केला.
मांजर डोळे बंद करून दुध पिते म्हणून त्याला कुणीही बघीतले नाही,असे होत नाही. भाजप सरकारचे ते झाले आहे. सरकारातील अस्थिरता आणि अंतर्गत कोफुसांवची कारणे जगजाहीर आहेत तरिही डोळे बंद करून दुध पिणाऱ्या मांजरासारखी पक्षाची झालेली अवस्था पाहुन खरोखरच आश्चर्य वाटते. खरे म्हणजे पत्रकारांनी काही मोजकेच प्रश्न विचारले असते तर लगेच मांजरीचे डोळे उघडले असते. पण हल्ली पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे हे मोठे पाप बनले आहे. एखादा पत्रकार अडचणीत आणणारे प्रश्न विचारत असले तर लगेच फोन संपादक अथवा व्यवस्थापनाला जातो. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर अप्रत्यक्ष काही आमदार,मंत्री बहिष्कार टाकल्यागतच वागत असतात. या कारणांमुळे अनेक पत्रकारांनी केवळ फेसबुक लाईव्हवरूनच बातम्या करण्याची सवय लावून घेतली आहे. तिथे उपस्थित टीव्ही पत्रकारांनी लग्न समारंभाचे चित्रीकरण करावे तशी पत्रकार परिषद कव्हर करायची आणि लोकांपर्यंत लाईव्ह पोहचवायची,अशीच काहीशी पद्धत सुरू झाली आहे. तरिही याला अपवाद काही पत्रकार निश्चितच आहे आणि त्यांच्या प्रश्नांवरून अनेकदा आमदार, मंत्री अडचणीत आल्याचेही पाहायला मिळते.
काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात मिळालेला प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरून झाल्याची चर्चा सुरू आहे. आता हेच नेते मुळ भाजपवाल्यांना डोईजड झाले आहेत. भाजपने नेहमीच ज्यांची वेगवेगळ्या माध्यमाने बदनामी केली, वेगवेगळे आरोप केले, अफवा पसरवल्या पण तरिही या नेत्याचे काहीच वाकडे होऊ शकले नाही ते विश्वजीत राणे आजच्या घडीला केंद्रातील भाजप नेत्यांच्या अगदी जवळचे ठरले आहेत. स्थानिक भाजपला त्यांच्या ताकदीचा अंदाज घेता आला नाही तो केंद्रीय नेतृत्वाने घेतला म्हणायचा. आता केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने ते वेगवेगळे निर्णय घेत आहेत पण या निर्णयांमुळे टीका मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सहन करावी लागत आहे. ते काहीच करु शकत नाही, कारण राणेंचे मतांचे मुल्य हे पक्षासाठी फार मोठे आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे नेतृत्वासाठीचा संयम आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असल्यामुळेच हे पद त्यांच्याकडे टीकून राहीले आहे. या पदावर राणेंचा डोळा आहे, ही गोष्ट काही लपून राहीलेली नाही परंतु ती खरोखरच पूर्ण होऊ शकते काय, याबाबत मात्र अनेक शंका – कुशंका आहेत. आता ह्याच नेतृत्वाच्या लढाईत विरोधकांच्या मदतीने एकमेकांबाबत बदनामीचे सत्र जे सुरू आहे ते एकंदरीत सरकारची प्रतीमा मलीन करणारे आणि सरकारसाठी धोक्याचे ठरू शकते याचे भानही या नेत्यांना राहीलेले नाही, याला काय म्हणावे.
राज्यासमोर रस्ते अपघात, पावसामुळे झालेली हानी, भूरूपांतरे, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी महत्वाचे प्रश्न असताना ही केस्तांवा जनतेचा संतापाला आमंत्रण ठरू शकणारी आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेळीच यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहील्यास त्याचे परिणाम संघटनेवर होतील. पक्षात काहीही झाले तरी सत्तेला कुणीही स्पर्श करू शकणार नाही,असा समज केंद्रीय नेतृत्वाचा असेल तर तो फोल ठरण्यास अजिबात वेळ लागणार नाही हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

  • Related Posts

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    प्रत्येकवेळी या धर्मातील लोकांना आपला राष्ट्रवाद, देशप्रेम, बंधुभाव सिद्ध करावा लागत असेल, तर मग या धार्मिक लोकांच्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. “धर्म, जाती, प्रांत, भाषा भेद सारे…

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    आपला धार्मिक एकोपा हीच आपली ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावरच आपण अशा दहशतवादाला सडेतोड प्रत्यूत्तर द्यायचे आहे हे विसरून चालणार नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    24/04/2025 e-paper

    24/04/2025 e-paper

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    23/04/2025 e-paper

    23/04/2025 e-paper

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?
    error: Content is protected !!