मनोज परब, हो सावधान!

मनोज परब हे युवा असल्यामुळे त्यांच्यातील सळसळतेपणा स्वाभाविक आहे. मात्र त्याला परिपक्वतेचा योग्य आकार दिला, तर गोव्याला एक गुणी नेतृत्व मिळेल, यात दुमत नाही.

गोव्याच्या राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या आणि अल्प काळात वेगळा दबदबा निर्माण केलेल्या आरजीपी पक्षाचा धसका सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे. बहुसंख्य युवा कार्यकर्ते आणि विशेषतः बहुजन समाज केंद्रीत असलेल्या या पक्षाला आटोक्यात कसे ठेवायचे, याची रणनिती सत्ताधारी पक्षासह विरोधकांनाही आखावी लागली आहे.
२०२२ च्या पहिल्याच निवडणुकीत आरजीपीने सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली. सांतआंद्रेसारख्या अल्पसंख्याकबहूल मतदारसंघात विरेश बोरकर हे अल्प मतांनी आमदार म्हणून निवडून आले, परंतु राज्यभरात पक्षाने मिळवलेली मते राजकीय विश्लेषकांनाही अचंबित करणारी ठरली. काँग्रेसचे मतदार आरजीपीकडे वळल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. तब्बल ११ उमेदवार आरजीपीकडे मते वळल्यामुळे पराभूत झाले. अल्पसंख्याक हे आपले पारंपारिक मतदार आहेत, असा विश्वास बाळगणाऱ्या काँग्रेसला रणनिती बदलणे भाग पडले. युवकांचा मोठा भरणा असलेल्या पक्षाच्या नेतृत्वातच फुट घालून आरजीपीला वेसण घालण्याची नीती प्रतिस्पर्धी पक्षांनी आखली आहे.
आरजीपीचा चेहरा म्हणून मनोज परब यांचे नेतृत्व उभे राहिले. वाळपई आणि थिवी येथे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाले. पराभवामुळे नेत्याचे महत्त्व कमी होते, परंतु विरेश बोरकर यांनी बाजी मारली. परब हे पक्षाध्यक्ष तर बोरकर हे आमदार. परब यांची आक्रमकता आणि सडेतोड वृत्ती ही प्रारंभी पक्षाची जमेची बाजू ठरली. त्यांच्या आक्रमकतेमुळेच आरजीपी आक्रमकपणे पुढे सरसावला. परंतु त्याच आक्रमकतेचे निमित्त करून आरजीपीला, किंबहुना परब यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विरोधकांनी विरेश बोरकर यांच्या शांत स्वभावाची तुलना परब यांच्या उग्रपणाशी करून परब यांना कोंडीत पकडण्याचा डाव सुरू केला आहे. या अपप्रचाराचा परिणाम काही प्रमाणात होत असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा आणि जिल्हा पंचायत निवडणुकीतही परब आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या शत्रूंच्या कारवाया तेज झाल्या आहेत. परब हे एकाधिकारशाहीने वागतात, इतरांना विश्वासात घेत नाहीत, अनादर करतात अशी कुजबुज आणि गुप्त प्रचार सुरू आहे. या गोष्टीची कल्पना परब यांना असल्याने ते या चक्रव्यूहातून बुद्धी, चातुर्य आणि कौशल्याचा वापर करून कसे सहिसलामत बाहेर पडतात, ही त्यांची कसोटी आहे.
भाजपच्या प्रारंभीच्या काळात मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईक यांच्याबाबतीतही अशीच रणनिती विरोधकांनी आखली होती. पर्रीकरांनी मात्र आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर त्याचा सामना केला. परब यांचा संबंध सतीश धोंड, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच विश्वजीत राणे यांच्याशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विदेशातील आरजीपी समर्थकांना हाताशी धरून परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप झाले. तरीही या सर्व टीकेचा सामना करत परब यांनी आपले पाय घट्ट रोवून ठेवले आहेत.
पर्रीकरांना श्रीपाद नाईक यांच्या विजयासाठी आकाशपाताळ एक करावे लागत असे, कारण त्यांच्या पराभवाचे खापर आपल्या डोक्यावर फोडले जाईल, याची कल्पना त्यांना होती. मनोज परब यांना विरेश बोरकर यांच्याबाबतीत हीच काळजी घ्यावी लागेल. बोरकर यांच्या राजकीय भवितव्याबाबतचा निर्णय घेताना त्यांना सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे, किंबहुना तडजोड करावी लागणार आहे. हे करत असताना त्यांना आपल्या राजकीय भवितव्याचाही योग्य विचार करावा लागेल; अन्यथा काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांच्यासारखी परिस्थिती त्यांची बनेल.
जोपर्यंत एखादा नेता निवडून येत नाही, तोपर्यंत त्याच्या नेतृत्वाला मान्यता प्राप्त होत नाही. परब हे नकळतपणे या चक्रव्यूहात दाखल झाले आहेत. आता सहिसलामत बाहेर पडून ते यशस्वी कसे होतील, याचा विचार त्यांना करावा लागेल. त्यांच्या आक्रमकतेचा, सहनशीलतेचा आणि संयमीपणाचा कस लागणार आहे.
राज्यभरात डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर चौफेर टीकाबाजी सुरू आहे. तरीही त्यांच्या संयमाचा एक इंचही हलत नाही. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर हा यशस्वी नेत्याचा मंत्र मानला जातो. मनोज परब हे युवा असल्यामुळे त्यांच्यातील सळसळतेपणा स्वाभाविक आहे, परंतु त्याला परिपक्वतेचा आकार दिला, तर गोव्याला एक गुणी नेतृत्व मिळेल, यात शंका नाही.

  • Related Posts

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    आज गरज आहे ती भीती झटकण्याची, स्वार्थ बाजूला ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मार्गाने संघटित होण्याची. तरुणाई ही कोणत्याही समाजाची ऊर्जा असते. समाजाचे वर्तमान आणि भविष्य यांच्यामधील सर्वांत मजबूत पूल…

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    You Missed

    Goa Statehood Day: Prabhav Naik Honours Opinion Poll Heroes and Cultural Icons

    Goa Statehood Day: Prabhav Naik Honours Opinion Poll Heroes and Cultural Icons

    PM Narendra Modi Extends Goa Statehood Day Greetings, Praises Goa’s Growth and Cultural Legacy

    PM Narendra Modi Extends Goa Statehood Day Greetings, Praises Goa’s Growth and Cultural Legacy

    Amit Patkar: Tenure as Goa Pradesh Congress Committee President

    Amit Patkar: Tenure as Goa Pradesh Congress Committee President

    Amit Patkar Says Commitment to Goa Remains Unchanged; “The Journey Continues”

    Amit Patkar Says Commitment to Goa Remains Unchanged; “The Journey Continues”

    Girish Chodankar Appointed GPCC President; AICC Announces New Goa Congress Leadership Team

    Girish Chodankar Appointed GPCC President; AICC Announces New Goa Congress Leadership Team

    Youth Congress Protests in Margao Against NEET Paper Leak, Rising Unemployment

    Youth Congress Protests in Margao Against NEET Paper Leak, Rising Unemployment