मुख्यमंत्री साहेब रागाऊ नका

जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि जनता दूरावणार नाही याची काळजी घेणे हेच खऱ्या लोकनेत्याचे लक्षण आहे.


भूतानीच्या विषयावरून टीकेचे लक्ष्य बनल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बरेच नाराज बनले आहेत. काल एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलताना ते रागावल्याचेही स्पष्ट झाले. आपल्याकडील एकाही खात्याने परवाना दिलेला नाही. आपले आणि भूतानीचे कसलेच संबंध नाहीत,असे सांगताना हे परवाने कधी दिले हे पत्रकारांनी शोधून काढावे,असे आव्हानही त्यांनी दिले. आता या प्रकल्पाला सरकारचा पाठींबा आहेच तर मग ही भाषा कितपत योग्य. भूतानीच्या कामगारांना पोलिस सरंक्षण मिळत असल्यामुळे सरकारचा पाठींबा या प्रकल्पाला आहे हे सिद्ध होते. सरकारने वास्तविक आणि मुख्यमंत्री सावंत यांनी उघडपणे भूतानीचे समर्थन करून हा प्रकल्प राज्यासाठी आणि स्थानिकांसाठी कसा फायद्याचा आहे हे पटवून देण्याची गरज होती. आपण परवाना दिला नाही,असे म्हणून त्यांना नेमके काय सांगायचे आहे. सरकारचा प्रत्येक मंत्री म्हणजे सरकार. ते राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी अशी विधाने करून लोकांच्या मनांत संभ्रम निर्माण करणे अयोग्य आहे.
नगर नियोजन खात्याकडून सध्या सुरू असलेल्या भूरूपांतरावरूनही मौन धारण करून चालणार नाही. हे सरकारचे निर्णय आहेत आणि त्यापासून मुख्यमंत्री अलिप्त राहू शकत नाहीत. एकतर त्यांनी या निर्णयांचे उघडपणे समर्थन करायला हवे किंवा हे निर्णय रद्दबातल ठरवून विरोधकांची हवाच काढून घ्यायला हवी. हे सगळे आपण करत नसून विश्वजीत राणे करत आहेत,असा छुपा अजेंडा राबवणे त्यांच्या नेतृत्वासाठी आणि सरकारसाठीही विश्वासार्ह ठरणार नाही. सध्या सरकारात केवळ मुख्यमंत्री आणि नगर नियोजनमंत्री हे दोघेच चर्चेत आहेत. मंत्रिमंडळातील बाकीचे मंत्री जणू अधांरातच चाचपडत असल्याचे दिसते. पक्षाची आणि केंद्रीय नेतृत्वाची मोठी दहशत असल्यामुळे कुणीही उघडपणे बोलू शकत नसले तरी खाजगीत सरकारी मंत्री आणि आमदारांची भेट घेतलात तर खरी परिस्थिती लक्षात येते.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोंयकार म्हणून आपली एक वेगळी ओळख ठेवली होती. राष्ट्रीय पक्षांसाठी काम करत असताना श्रेष्ठींचा मान राखावाच लागतो परंतु अगदीच श्रेष्ठींसमोर नांगी टाकण्याची वेळ आली तरिही तशी प्रतिमा दाखवायची नसते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मात्र आपण श्रेष्ठींना कसे मानतो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कसे प्राणपणाने पालन करतो यातच धन्यता मानणारे आहेत. पक्ष म्हणून श्रेष्ठींचा आदर करणे भाग आहेच परंतु ज्या जनतेने निवडून दिले आहेत, त्यांचा मान आणि सन्मान दुखावणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निवडणूकीत मते मिळवणे याचा आणि सरकारच्या कार्यपद्धतीचा काहीच संबंध नाही. मते मिळवणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि त्यासाठी वेगळी गणिते मांडली जातात. जेव्हा मतांची भिती किंवा जनतेच्या भावनांची भितीच सरकारला राहत नाही तेव्हा सरकार का म्हणून लोकांचा विचार करणार असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
सगळ्यांवर रागावून चालणार नाही. मुख्यमंत्री विरोधक किंवा आंदोलनकर्त्यांवर असेच रागावत राहीले तर ते आपल्या मनाची शांती ते हिरावून बसणार आणि हे त्यांच्यासाठी परवडणारे नाही. तसे संयम ही त्यांची जमेची बाजू राहीलेली आहे परंतु सरकारचे कुठेतरी नियंत्रण प्रशासनावर राहीले नसल्याने लोकांच्या टीकेचा सुर वाढत चालला आहे आणि त्यातून जर मुख्यमंत्री संताप व्यक्त करू लागले तर हे त्यांच्यासाठी चुकीचेच आहे.
जनता काय ती बोलत राहणार आणि निवडणूकीच्या वेळी आपल्याकडेच येणार अशी धारणा अनेक राजकीय नेत्यांची आहे. हे अगदीच चुकीचे नसले तरी अगदीच बरोबरही म्हणता येणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि जनता दूरावणार नाही याची काळजी घेणे हेच खऱ्या लोकनेत्याचे लक्षण आहे

जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि जनता दूरावणार नाही याची काळजी घेणे हेच खऱ्या लोकनेत्याचे लक्षण आहे.

  • Related Posts

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    सरकार, पोलीस, न्यायव्यवस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिक या सर्वांनी मिळून सामाजिक अध:पतनाच्या या संकटाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२४ च्या अहवालाने गोव्याबाबत…

    बाबाच्या भक्तांनो हे समजून घ्या !

    आता ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित केलेल्या जमिनीही ३९(ए) अंतर्गत बदलता येऊ शकतात. मग स्वतःपासूनच या जमिनी वाचवण्याची ही धडपड का, असा प्रश्न पडतो. सकाळी पहाटेच एका मित्राचा फोन आला.…

    You Missed

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    09/05/2026 e-paper

    09/05/2026 e-paper

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार