एक भारत, श्रेष्ठ भारत !

देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिल्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. प्रारंभी नऊ अतिरेक्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून ते उध्वस्त केले गेले, ज्यामुळे शेकडो दहशतवादी ठार झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर बेछूट गोळीबार केला, ज्यात सीमेलगतच्या गावांतील अनेक भारतीय नागरिक आणि एक भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
ऑपरेशन सिंदूर ही केवळ २५ मिनिटांची कारवाई असली तरी भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तराच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे हा संघर्ष युद्धात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताने पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. कालपर्यंत कराची, लाहोरसह पाकिस्तानच्या अनेक प्रमुख शहरांवर भारताने मिसाइल्सचा मारा करून त्याला जबर धक्का दिला आहे. पेहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानने का भोगावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, सीमेलगतच्या घुसखोरीत आणि दहशतवादी कारवायांत पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यातील हवाई हल्ल्यांतून दहशतवादी तळ उध्वस्त झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्यामुळे दहशतवादाच्या स्वरूपात वावरणाऱ्या पाकिस्तानला या हल्ल्यांतून हात वर करता येणार नाही.
दहशतवादाविरोधातील ही कारवाई प्रारंभी मर्यादित समजली जात होती. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेमुळे याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात होण्याची शक्यता आहे. भारताशी समोरासमोर युद्ध करण्याची पाकिस्तानची ताकद नाही, तर भारताच्या सध्याच्या आक्रमक पवित्र्याला तात्काळ प्रत्युत्तर देण्याची क्षमता पाकिस्तानात नाही. मात्र, पाकिस्तान छुप्या किंवा आत्मघातकी हल्ल्यांमध्ये पटाईत आहे. अशा आत्मघातकी हल्ल्यांना रोखायचे असेल, तर अंतर्गत सुरक्षायंत्रणा चोख असणे आवश्यक आहे.
दर एका भारतीयाने सतर्क राहून आपल्या अवतीभोवतीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. सीमेलगत आपले जवान जसे डोळ्यात तेल घालून पहारा करतात, तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिले पाहिजे. केवळ जनतेने सतर्क राहून उपयोग नाही; संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी त्वरित सरकारी यंत्रणांना माहिती दिली पाहिजे. तसे झाल्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी यंत्रणाही तत्परतेने कार्यरत राहू शकते.
युद्धाच्या या काळात संपूर्ण भारत एकसंघ आहे. भारतीय जनता सरकार आणि संरक्षण यंत्रणांच्या मागे ठामपणे उभी आहे. आपल्या अवतीभोवती कोणत्याही जवानाचे कुटुंब राहत असेल, तर त्यांना धीर देण्याची जबाबदारी आपली आहे. या प्रसंगी जवानांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल.
या कठीण प्रसंगात संयम बाळगणे आणि जबाबदारीने वागणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

  • Related Posts

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    निवडणुकीच्या आधी भरती करून मतांची बेगमी करायची आणि नंतर त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे, हा प्रकार गेली अनेक दशके सुरू आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की सरकारी भरतीच्या…

    गोंयकार जागा होईल ?

    त्यामुळे आर्थिक विकासाबरोबर शाश्वततेचाही विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दशकांनंतर गोवा नकाशावर राहील, पण त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये कायमची नष्ट होतील कारापूरमधील आंदोलनाने ७७ दिवसांचा टप्पा पार केला आहे.…

    You Missed

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival