बनावट “विल”; पोलिसांची भूमिका संशयास्पद?

गुन्हा नोंदवण्याबाबत हलगर्जीपणा भोवणार

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

धारगळ-दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातील सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन पोलिस निरीक्षक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण त्यांनी गुन्हा नोंदवण्यात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे.
विलचा उगम आणि वाळपई उपनिबंधकांची कारवाई
गणपत गोवेकर यांनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे विलसंबंधी माहिती मागवली. त्यावर वाळपई उपनिबंधकांनी स्पष्ट केले की असे विल त्यांच्या कार्यालयात नोंदच झालेले नाही. गोवेकर यांनी सुभाष कानुळकर यांनी तयार केलेल्या बनावट विलाची प्रत उपनिबंधकांच्या नजरेला आणून दिल्यानंतर वाळपई उपनिबंधक कार्यालयाचे शिक्के आणि अनेक अधिकाऱ्यांची नावे त्यावर वापरल्याचे दिसून आले.
वाळपई उपनिबंधकांनी हा प्रकार राज्य निबंधकांच्या निदर्शनास आणला, आणि राज्य निबंधकांनी वाळपई पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली. त्यानुसार, तत्कालीन वाळपई उपनिबंधक गौरेश बुगडे यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती, पण आजतागायत गुन्हा नोंद झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पेडणे पोलिस निरीक्षकांकडून चालढकल
शांताराम कानुळकर यांच्या मुलींनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे खातरजमा करून, पेडणे पोलिस स्थानकात सुभाष कानुळकर याच्याविरोधात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रार दाखल केली. पण पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली.
अखेर तक्रारदारांनी पेडणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली, ज्यामुळे ३१ जुलै २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा नोंद झाला.
परंतु संशयिताला अटक करण्यासही पोलिसांनी उशीर केला. सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली गेली, पण तिथे जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यासाठीही संधी दिली.
खंडपीठाने चौकशीला सहकार्य करण्याच्या अटीवर संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण त्यानंतर पेडणे पोलिसांनी चौकशीसाठी विशेष रस दाखवला नाही.
वाळपई पोलिसांचे दुर्लक्ष
वाळपई उपनिबंधक कार्यालयाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल वाळपई पोलिसांनी घेतली नाही. पीडित कुटुंबाने नव्याने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
तत्कालीन वाळपईचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी हे प्रकरण तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गड्डी यांच्याकडे पाठवले होते, पण गड्डी यांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे आता समोर आले आहे.
वाळपईचे विद्यमान पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी नव्याने दाखल झालेल्या तक्रारीवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • Related Posts

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे…

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    You Missed

    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 19 views
    आता जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 13 views
    राजकारणापलीकडे समाजाची जबाबदारी

    28/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 28, 2026
    • 38 views
    28/03/2026 e-paper

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 14 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 21 views
    27/03/2026 e-paper