पत्रकार किशोर नाईक गांवकर यांचे आवाहन
गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)
शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण आणि ज्ञानाच्या बळावरच विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक बाबतीत केवळ सरकारकडे मागणी करून चालणार नाही. समाज संघटनेने आपल्या ज्ञातीबांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन पत्रकार किशोर नाईक गांवकर यांनी केले.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात मोठ्या दिमाखात साजरा झाला. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठी समाजातील दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे निवृत्त पोलिस अधीक्षक तथा महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश नाईक गांवकर, सन्माननीय अतिथी डॉ. मिलिंद देसाई, पत्रकार किशोर नाईक गांवकर, महासभेचे गोवा पॅट्रोन राम स्वरूप सिंह परीहार, गोवा प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ देसाई, प्रकाश गावस, प्रमोद शेटगावकर, सौ. प्रफुल्ला सावंत देसाई, सौ. विद्या परब, सौ. रेणुका देसाई तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारकडे सर्व घटकांची जबाबदारी असते. जिथे सरकार कमी पडते, तिथे ती उणीव भरून काढण्यासाठी समाज संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. आयएएस, आयपीएस तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी संघटनेतर्फे प्रशिक्षणवर्ग भरविण्यात आले, तर त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. समाज संघटनेकडून शैक्षणिक स्तरावर एक कॉर्पस फंड तयार करून समाजबांधवांच्या विद्यार्थ्यांना विनाव्याज कर्ज उपलब्ध करून दिल्यास समाज शैक्षणिक क्षेत्रात झेप घेऊ शकतो, असेही यावेळी नाईक गांवकर म्हणाले.
क्षत्रिय समाजातील विविध ज्ञातींनी महासभेच्या झेंड्याखाली राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महासभेचा पदाधिकारी झाल्यानंतर याची ओळख झाली. गोव्यातील गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाला या राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्यासाठीच राज्यात महासभा सक्रिय करण्यात येत असल्याचे महेश नाईक गांवकर यांनी सांगितले.
डॉ. मिलिंद देसाई यांनी शैक्षणिक दृष्ट्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाने उंच भरारी घेण्याची गरज व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातील कुणालाही मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज असल्यास त्यांनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना सहाय्य करणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. एकमेकांना सहाय्य करून आणि आधार देऊन वर काढण्यासाठी समाजाने एकत्रितपणे काम करायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महासभेचे प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ देसाई यांनी महासभेच्या कार्याची माहिती दिली, तसेच राज्यातील समाजाच्या विविध विषयांवर महासभा कार्यरत असल्याचे सांगितले. प्रस्ताविक अॅड. प्रियंका देसाई यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया वंसकर यांनी केले आणि आभार निता परब यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार संतोष प्रभू देसाई, लक्ष्मण सावंत देसाई, नंदा सावंत देसाई, राजेंद्र देसाई, संजय देसाई, किशोर सावंत, किरण सावंत, सुधाकर देसाई, आश्विनी अनय देसाई, सुश्मिता देसाई, प्रतिभा देसाई, सुशीला परीहार, लिंगू सावंत, रेश्मा सावंत, शोभा सावंत, प्रिया देसाई, अमृता गावस देसाई, सुवांती गांवकर यांनी परिश्रम घेतले.








