सातपैकी सहाजणांना अटक, माल हस्तगत
गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)
बायणा–वास्को येथील चामुंडी आर्केडमधील सागर नायक यांच्या फ्लॅटवरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी अखेर सातपैकी सहा दरोडेखोरांना बंगळूरू येथून अटक केली आहे. या प्रकरणी काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ रोजी पर्तगाळ येथील समारंभाला उपस्थित राहणार असल्याने त्यापूर्वीच दरोडेखोरांना अटक झाल्यामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे.
बायणा–वास्कोतील या दरोड्यामुळे राज्य सरकार आणि पोलिस खात्याची मोठी नाचक्की झाली होती. यापूर्वी दोनापावला आणि म्हापसा येथे असेच दरोडे पडले होते, ज्याचा अजूनही पोलिसांना शोध लागलेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या दरोड्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभारावरून भाजप सरकारवर टीका सुरू आहे.
पोलिसांवर माझा विश्वास
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. “आपण यापूर्वीच दरोडेखोरांना अटक करणार असल्याचे जाहीर केले होते. या दरोडेखोरांना गोव्यात आणले जाणार आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.
पोलिसांच्या प्रतिष्ठेचा विषय
वास्को दरोड्यामुळे पोलिसांची प्रतिष्ठाच पणाला लागली होती. वरिष्ठ स्तरापासून ते खालच्या स्तरापर्यंत सर्व पोलिसांनी अथक प्रयत्न करून अखेर या दरोड्याचा निकाल लावला. सातपैकी सहाजणांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे. दरोड्यातील काही माल जप्त करण्यात आला आहे तसेच काहीजणांची ओळखही पटली आहे. “काहीच पुरावा नसलेल्या या प्रकरणाचा शोध लावून पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली,” असे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी सांगितले.






