सेवा नियमितीकरणावरून प्रचंड असंतोष
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीअंतर्गत रोजंदारी, कंत्राटी तसेच तात्पुरत्या दर्जावर काम करणाऱ्या सुमारे २ हजार कामगारांनी सेवा नियमितीकरणाच्या मागणीसाठी जन उठाव करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल रोजी पणजी येथे कुटुंबांसह भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीमार्फत कामगारांची भरती सुरू आहे. मात्र, नियमीत पदांची घोषणा झाल्यानंतर सोसायटीतील कामगारांना डावलून इतरांना नियुक्त केले जाते. रोजंदारी, कंत्राटी आणि तात्पुरता दर्जा बहाल करूनही या कामगारांना नियमित कामगारांपेक्षा कितीतरी कमी वेतन दिले जाते. भत्ते व इतर सुविधा देखील त्यांना मिळत नाहीत. न्यायासाठी अनेक ठिकाणी याचना करूनही उपयोग न झाल्याने आता अंतिम लढा उभारण्याचा संकल्प कामगारांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे वचन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पात दहा वर्षे पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा सोसायटी कामगारांना लागू होईल का, याबाबत कायदेशीर अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने जग्गो विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात दहा वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना सेवेत नियमित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हंगामी किंवा कंत्राटी भरती न करता नियमित कामगारांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने बजावले आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
जनसभा
१४ एप्रिल रोजी पणजी येथे भव्य कामगार जनसभा आयोजित केली जाणार आहे. सर्व कामगार आपल्या कुटुंबियांसह या सभेत सहभागी होतील. या सभेत पुढील कृती आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कामगार संघटनेच्या नेत्यांनी दिली.





