हाऊस ऑफ अभिनंदन लोढाकडून बदनामीचा दावा
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
कारापूर–सर्वण येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीच्या तथाकथित पंचतारांकित बांधकाम प्रकल्पातील गैरकृत्ये आणि बेकायदेशीर बाबींचा पोलखोल केलेल्या सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्याविरोधात कंपनीकडून १५ कोटी रुपयांचा बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात हा खटला दाखल करून शेर्लेकर यांना मुंबईत हेलपाटे मारायला लावण्याची शक्कल कंपनीने लढवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेर्लेकर यांनी या प्रकल्पासंबंधी आत्तापर्यंत जारी केलेले व्हिडिओ, ब्लॉग तसेच इतर प्रसारमाध्यमांचा वापर करून खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवून कंपनीची अप्रतिष्ठा केली, असा दावा करण्यात आला आहे. या अनुषंगानेच हा खटला दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न दाखल करता थेट मुंबईत दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेर्लेकर यांना मुंबईत वारंवार जावे लागेल आणि त्यांची दमछाक होईल, या उद्देशानेच हे केले असावे, असा समर्थकांचा आरोप आहे.
शेर्लेकर यांच्यावतीने कोर्टात वकील दाखल
सामाजिक कार्यकर्ते शेर्लेकर यांना शेवटच्या क्षणी यासंबंधीची नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ६ रोजी पहिल्या सुनावणीवेळी त्यांच्या वतीने वकिलांनी हजेरी लावली, तर ७ रोजी दुसऱ्या वकिलांनी हजेरी लावून या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. जिथे न्यायासाठी धाव घ्यावी लागते, त्याच न्यायालयाचा वापर करून सत्यासाठी लढणाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
कारापूर आंदोलनाचा ३४ वा दिवस
कारापूरवासियांनी लोढा प्रकल्पाविरोधात छेडलेल्या आंदोलनाला आज ३४ दिवस पूर्ण होत आहेत. कंपनीच्या वतीने संचालक नयन भेडा यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांची भेट शेर्लेकर यांच्याशी झाली. शेर्लेकर यांनी युक्तिवाद करताना हा प्रकल्प कारापूर गावाच्या मूळ अस्तित्वावरच कसा डेरा ठरेल, हे स्पष्ट केले होते.
या आंदोलनाचे मूळ प्रेरणास्थान शेर्लेकर असल्यामुळेच आता त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी हा डाव खेळला जात आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. हे आंदोलन मागे घेणार नाहीच, परंतु अख्खा गाव शेर्लेकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार, असे कारापूरवासियांनी स्पष्ट केले आहे.





