स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश
गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)
गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग यांच्यासह असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून राज्यपालांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेले मजबूत, एकसंध आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे त्यांनी म्हटले.
गोवा मुक्तीच्या लढ्यालाही अभिवादन
गोव्याची समृद्ध संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, पर्यटन, उद्योजकता आणि सामाजिक सलोखा यांचा उल्लेख करताना राज्यपालांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी झालेल्या गोवा मुक्तीच्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण केले. स्वातंत्र्य आणि मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान पुढील पिढ्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
निसर्गसंपदा जपूनच विकास
गोव्याची जंगले, नद्या, समुद्रकिनारे, पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तरुणांनी ज्ञान, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सांस्कृतिक व नैतिक मूल्यांशी नाते कायम ठेवावे. युवा शक्ती ही देशाच्या भवितव्याची सर्वात मोठी ताकद असून तिचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी व्हावा, असेही त्यांनी म्हटले.
गुंतवणुकीसोबत रोजगारनिर्मितीवर भर
राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा स्थानिकांना मिळण्याची गरज आहे. गुंतवणुकीतून स्थानिक रोजगार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच विकास शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने व्हावा, असे राज्यपाल म्हणाले. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देतानाच सामुदायिक सलोखा, शांततापूर्ण सहअस्तित्व आणि परस्पर आदर कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
कर्तव्यभावनेने राष्ट्रनिर्मितीत सहभागी व्हा
कायद्याचा आदर, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सेवाभाव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. एकता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा जपत विकसित, मजबूत व आत्मनिर्भर भारत आणि समृद्ध, शांततापूर्ण गोवा घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी स्वातंत्र्यदिन संदेशातून केले.





