विजय सरदेसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)
फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून फातोर्डा येथील घाऊक मासळी बाजारालगतची संपादीत भातशेती जमीन शेतकरी व कृषी भोगवटेदारांना परत देण्याची मागणी केली आहे.
सरदेसाई यांनी नमूद केले की, ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी ही जमीन ताब्यात घेण्यात आली होती, मात्र आजपर्यंत त्या उद्देशासाठी वापर झालेला नाही आणि जमीन अजूनही शेतीखाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अलीकडेच या जमिनीच्या परताव्याबाबत भूमिका घेतल्याचा उल्लेख करून सरदेसाई यांनी सरकारला न्याय्य तोडगा काढण्याची संधी असल्याचे म्हटले.
संपादीत जमीन परत करण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करून पात्र भोगवटेदारांचे हक्क पुनर्स्थापित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………….
मडगावात हायड्रॉलिक पार्किंगचा फेरविचार व्हावा
मडगांवचो आवाज प्रभव नायक यांचे निवेदन
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)
मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी आज गोवा राज्य शहरी विकास एजन्सीच्या अभियंत्यांची भेट घेऊन प्रस्तावित मडगांव शहरातील हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करावा, अशी मागणी केली.
“हायड्रॉलिक पार्किंग कागदावर आकर्षक वाटू शकते, परंतु मडगांव ही प्रयोगशाळा नाही. गोव्याच्या हवामानाचा विचार करून सविस्तर व्यवहार्यता अभ्यास होणे आवश्यक आहे. निवडणूक निधी उभारणीसाठी लोकांवर अव्यवहार्य प्रकल्प लादण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक वेंसी सिरीलो अँजेलो गोन्साल्विस आणि प्रकाश शेटकर उपस्थित होते.
नायक यांनी निदर्शनास आणून दिले की हायड्रॉलिक पार्किंग यंत्रणांना नियमित देखभाल, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात खर्चाची आवश्यकता असते. गोव्याच्या दमट व किनारी हवामानामुळे गंज आणि तांत्रिक बिघाडाची शक्यता अधिक असल्याने हा प्रकल्प भविष्यात निष्क्रिय ठरण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले.
नायक यांनी जीसुडा किंवा इतर यंत्रणांमार्फत राबविण्यात आलेल्या तत्सम हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पांची माहितीही मागितली. तसेच अशा प्रकल्पांचा अनुभव असलेल्या सल्लागारांची पात्रता व किनारी भागांतील त्यांच्या कामाचा तपशील सादर करण्याची मागणी केली.




