विधानसभा निवडणुकांमुळे सावध पवित्रा
गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)
राज्य सरकार सध्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर “ऑन होल्ड मोड”वर गेले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने जनतेची नाराजी ओढवून घेणारा एकही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाही, असे पक्षाने ठरवले आहे. टुरिस्ट टॅक्सी धोरण तसेच एआय कॅमेरांमार्फत दंड ठोठावण्याचा निर्णयही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
वाहतूकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. टुरिस्ट टॅक्सी धोरण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. हजारो टॅक्सी व्यवसायिकांशी संबंधित हा विषय घाईगडबडीत घेणे शक्य नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय घेणे म्हणजे आगीशी खेळ असल्याने तो विषय लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे मंत्री गुदीन्हो यांनी व्यक्त केले.
६ रोजी महत्वाची बैठक
दरम्यान, रस्ते सुरक्षा तसेच वाढते रस्ते अपघात या विषयावर मात्र ६ जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्य सरकारने रस्ते अपघात टाळण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. “रेंट ए कार” आणि “रेंट ए बाईक” या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. मद्यपान करून वाहने हाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात “रेंट ए कार” अपघातांत अशी प्रकरणे बरीच आढळून आली आहेत. वाहतूक खात्याने यासंबंधी पोलिसांना पत्र पाठवून मद्यपान करून वाहने हाकणाऱ्यांविरोधात कडक धोरण अवलंबण्याची सूचना केली आहे. रस्ते अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एआय कॅमेरा दंडाचे धोरण लांबणीवर
एआय कॅमेरांमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चलन देण्याचे धोरण १ जुलैपासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा निर्णय आता १५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहितीही वाहतूकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी दिली.
चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या
आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी राज्यातील वाहतूक खात्याच्या चेकपोस्टवरील नियुक्त्यांत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा पोलखोल केला होता. या पोलखोलनंतर एकच खळबळ उडाली होती. वाहतूक खात्याने चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. काही अधिकाऱ्यांना चेकपोस्टवरून हटविण्यात आले आहे तर नवीन अधिकाऱ्यांना चेकपोस्ट नियुक्तीची संधी दिली आहे. चेकपोस्टवरून इतरत्र बदली झालेले काही अधिकारी पुन्हा चेकपोस्टवर नियुक्त झाल्याने तो देखील चर्चेचा विषय बनला आहे.







