सुदीप ताम्हणकरांचा सरकारला सल्ला
गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी)
चोडण–रायबंदर जलमार्गावरील रो-रो फेरीसेवा सरकारने भाडेतत्त्वावर न चालवता स्वतः फेरीबोटी खरेदी करून चालवाव्यात, असा सल्ला आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे. यापूर्वी २९ मे २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या पाठपुराव्याअंतर्गत सरकारला स्मरणपत्र पाठवून त्यांनी याची आठवण करून दिली आहे.
माहिती अधिकार कायद्याखाली मिळवलेल्या माहितीप्रमाणे, जुलै २०२५ ते मे २०२६ या कालावधीत चोडण–रायबंदर मार्गावरील दोन रो-रो फेरीबोट सेवेमधून नदी परिवहन विभागाला ९२.५५ लाखांचे उत्पन्न मिळाले. मात्र, याच कालावधीत विजय मरीन सर्व्हिसेस या कंपनीला भाडे म्हणून ₹१०.६५ कोटी अदा करण्यात आले. त्यामुळे सुमारे ९.७३ कोटींचा तुटवडा सार्वजनिक निधीतून भरून काढावा लागला. “हा प्रकार सरकारच्या वित्तीय व्यवस्थापनात कसा बसतो?” असा सवाल ताम्हणकर यांनी उपस्थित केला.
सध्या ‘द्वारका’ आणि ‘गंगोत्री’ या दोन रो-रो फेरीबोटींच्या संचालनासाठी १० जुलै २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत ६.३९ लाख लिटर डिझेल वापरण्यात आले असून, यावर ६.३० कोटींचा खर्च झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
यापूर्वी सरकारने दोन नवीन रो-रो फेरीबोटी खरेदी करण्यासाठी सुमारे २५ कोटींचा अंदाजित खर्च विचारात घेतला होता. मात्र, जर पुढील पाच ते सहा वर्षे भाडेतत्त्वावरील सेवा सुरू ठेवली, तर सरकारला ४८ ते ५८ कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. त्याऐवजी स्वतःच्या फेरीबोटी खरेदी केल्यास त्या सरकारची कायमस्वरूपी मालमत्ता ठरतील आणि दीर्घकालीन आर्थिक बचतही होईल, असे ताम्हणकर यांनी सूचवले आहे.





