या सर्व राजकीय घडामोडी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी शुभवार्ता ठरू शकतात. विरोधक जर असे विभागले गेले, तर डॉ. प्रमोद सावंत राज्यात नवा राजकीय इतिहास रचतील, यात अजिबात दुमत नाही.
देशभरात भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात असताना, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आम आदमी पार्टीच्या राज्य प्रभारी तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी केलेले राजकीय वक्तव्य अचंबित करणारे ठरले आहे. राज्यातील भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असा जनतेचा विचार असताना, आतिशी यांनी काँग्रेससोबत युतीची शक्यता फेटाळून लावली. हे नेमके कशाचे द्योतक आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा घटक असलेला आम आदमी पक्ष आता त्या आघाडीतून बाहेर पडला आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढल्यामुळे झालेले नुकसान देशाने पाहिले आहे. ही चूक इतरत्र होऊ नये, अशी अपेक्षा लोक धरून असताना, आतिशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करणे स्वाभाविक आहे. काँग्रेस पक्षावर लोक विश्वास ठेवत नाहीत. काँग्रेसवर निवडून आलेले आमदार भाजपात प्रवेश करतात. विरोधी पक्ष नेत्यासह दोन वेळा गोव्यातील काँग्रेसचा गट भाजपात सामील झाला. यापुढे हे होणार नाही, याची कोण शाश्वती देऊ शकतो? असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या सवालात काहीच गैर नाही आणि ते पूर्णतः सत्य आहे. मात्र, या परिस्थितीतून चर्चेअंती तोडगा काढण्याची आणि ठोस धोरण आखण्याची गरज आहे. स्वबळावर निवडणूक लढवणे हे उत्तर नाही. निवडून आलेले आमदार फुटणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. भाजपने अनेक राज्यांत काँग्रेसच्या आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचे सत्र सुरू केले आहे. गोव्यात तर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांनाही पक्षात घेतले आहे. काँग्रेसविषयी लोकांमध्ये अविश्वास निर्माण व्हावा, हा या धोरणाचा हेतू नसेल कशावरून? दिल्लीत आम आदमी पक्षाकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे गोव्याचा फॉर्म्युला तिथे लागू होऊ शकला नाही. आता दिल्लीत सत्ता गमावलेला आप पक्ष प्रमुख विरोधी पक्ष आहे. गोव्यातही आपला विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावावी लागेल. जर आप पक्ष भाजपच पुन्हा सत्तेवर येईल, या मानसिकतेतून वागत असेल, तर ही मानसिकता भाजपच्या फायद्याची ठरू शकते. काँग्रेसचे आमदार फुटतात, तर आतिशी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे कसे ठरू शकते? मात्र, त्यासाठी वेगळी चूल थाटणे हा उपाय नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हे जर विरोधकांच्या अजेंडावर असेल, तर त्यासाठी योग्य डावपेच आखण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष जे उमेदवार निवडतो, ते प्रामाणिक नसतात. यावेळी जनता उमेदवार निवडणार आणि काँग्रेससह इतर विरोधकांनी त्यांना उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव माजी आमदार राधाराव ग्रॅशीएश यांनी मांडला आहे. हे उमेदवार जर विरोधी पक्ष स्वीकारत नसतील, तर नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करून त्यांना रिंगणात उतरवावे, असेही त्यांनी सुचवले आहे.
या सर्व राजकीय घडामोडी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी शुभवार्ता ठरू शकतात. विरोधक जर असे विभागले गेले, तर डॉ. प्रमोद सावंत राज्यात नवा राजकीय इतिहास रचतील, यात अजिबात दुमत नाही.






