काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार?

भाजपने सर्वांत मोठी खेळी केली ती म्हणजे काँग्रेस पक्षात आपले हेर पाठवले. काँग्रेसनेही ते स्वीकारले आणि त्यांच्याकडे पदेही बहाल केली.

राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत राहीलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था खूपच बिकट बनली आहे. फक्त तीन आमदार विधानसभेत राहीलेल्या या पक्षाला खरोखरच नवसंजिवनी मिळणार काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशात आणि राज्यातही सर्वाधिक काळ सत्तेत राहीलेला पक्ष अजूनही आपल्या भूतकाळातील वैभवाची स्वप्ने पाहत आहे. भाजपने वेळोवेळी स्वतःमध्ये जी लवचिकता प्राप्त केली ती लवचिकता काँग्रेस पक्षाला आत्मसात करणे गरजेचे आहे. कधीकाळी हिंदूत्ववादी पक्ष आणि अजूनही तोच अजेंडा प्रखरपणे पुढे नेणारा पक्ष असूनही गोव्यातील अल्पसंख्यांक आमदार भाजपला सत्तेसाठी चिकटताना अजिबात डगमगत नाही, यावरून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. अलिकडेच पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला हजेरी लावली. परंपरेप्रमाणे ही बैठक वादळी झाली. या बैठकीत अनेकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. हे काँग्रेससाठी नवीन निश्चितच नाही परंतु सध्याची परिस्थिती पाहता या गोष्टी पक्षासाठी हानीकारक ठरणार आहेत, हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे युवा आहेत. त्यांच्यात जिद्ध आहे आणि काम करण्याची प्रचंड तयारी आहे. परंतु ते पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि यापूर्वीच्या कार्यात नसल्याने त्यांना अनेकजण नवखे मानतात. पक्षात आपले योगदान आणि त्याग याचा हिशेब करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. पक्षासाठीच्या योगदानाचा आणि त्यागाचा हिशेब हा मुळ भाजप कार्यकर्त्यांना विचाराल तर त्याचे योग्य उत्तर त्यांना मिळू शकेल. भाजपने सर्वांत मोठी खेळी केली ती म्हणजे काँग्रेस पक्षात आपले हेर पाठवले. काँग्रेसनेही ते स्वीकारले आणि त्यांच्याकडे पदेही बहाल केली. या हेरांमार्फत पक्षाच्या सगळ्या गोष्टी भाजपकडे पोहचायला मदत होत होती. आता देखील पक्षात एकमेकांवर भाजपचे हेर असल्याचे आरोप केले जातात. हे आरोप आमदारांवरही होतात, इथपर्यंत त्यांची पत उतरली आहे. अशा या परिस्थितीत अंतर्गत कलह आणि कुरघोडी यामुळे पक्ष पुन्हा उभारी कसा का घेऊ शकेल हा चिंतेचा प्रश्न आहे.
गेली चौदा वर्षे राज्य करणाऱ्या भाजपकडून अनेक चुका घडत आहेत. अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारविरोधात वातावरण तयार करण्यासाठी पोषक वातावरण असतानाही त्याचा फायदा घेण्यात काँग्रेस कमी पडत आहे. अर्थात विरोधात फक्त ७ आमदार आणि त्यात काँग्रेसचे फक्त ३ आमदार असल्याने संघटनेच्या उभारणीला पर्याय नाही. कागदोपत्री पदाधिकाऱ्यांच्या याद्यांचा काहीच उपयोग नाही. हे पदाधिकारी रस्त्यावर उतरणारे हवेत. पक्षाच्या संघटनेची नव्याने पुर्नरचना करण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींनी अमित पाटकर यांना दिले आहेत. याचा अर्थ श्रेष्ठींनी अमित पाटकर यांच्यावर विश्वास ठेवला आहे. किमान हे ओळखून आता तरी त्यांच्या विरोधकांनी त्यांना साथ द्यावी किंवा पटत नसेल तर वेगळा मार्ग स्वीकारावा. पक्षात राहूनच पक्षाला अडचणीत आणण्याचे हे कारनामे काँग्रेस पक्षाने खपवून घेतल्यास त्यांचे सत्तेतील फेरआगमन कठीण बनणार आहे हे मात्र खरे.

  • Related Posts

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    किती म्हणून सहन करणार ?

    आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे, प्रशासनासाठीही आणि समाजासाठीही. अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि त्याची किंमत सामान्य जनतेलाच आपल्या आरोग्याने आणि जीवाने मोजावी लागेल. दाबोळी विधानसभा…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 27 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 23 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 7 views
    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 17 views
    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 14 views
    किती म्हणून सहन करणार ?