१८ जून रोजी क्रांतीदिनी पक्षाची रणनिती ठरणार
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
काँग्रेसमधील सर्व मतभेद आणि अंतर्गत वाद आता संपूष्टात आले आहेत. आगामी १८ जून रोजीच्या क्रांती दिनाचे औचित्य साधून गोव्यासाठी काँग्रेसची आगामी रणनिती निश्चित केली जाणार आहे. याशिवाय प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीसह अन्य समित्यांची घोषणा पुढील पंधरवड्यात केली जाणार आहे. पक्ष संघटित पद्धतीने भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा पोलखोल करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने नियुक्त केलेल्या सर्व प्रभारींची संयुक्त बैठक आज काँग्रेस भवनात प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांची नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी पहिल्यांदाच भेट झाली. कार्यकारी अध्यक्ष आमदार एड. कार्लूस फरेरा हे देखील बैठकीला उपस्थित होते. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष तथा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन आणि उपाध्यक्ष सुनील कवठणकर मात्र अनुपस्थित होते. बैठकीला उशिरा झाल्यामुळे पत्रकार परिषदेला सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकरही उपस्थित होत्या.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माणिकराव ठाकरे यांनी आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती दिली. काँग्रेस राज्य कार्यकारिणी, जिल्हा समिती, मंडळ समिती तसेच इतर समित्यांची घोषणा क्रांतीदिनी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने भव्य सभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशीच पक्षाच्या पुढील कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून त्याबाबतही आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. राज्यातील भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचून गोव्याला भाजपमुक्त करण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे. या संकल्पासाठी पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्या
पक्ष संघटनेत बदल होत राहतात. एखाद्या पदावर दीर्घकाळ राहिल्याने काही लोक भावनिक दृष्ट्या जोडले जातात. त्या पदावरील व्यक्ती बदलल्यानंतर त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पक्षासाठी सर्वांनी एकसंघपणे काम करणे अपेक्षित आहे. पक्षाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण पक्षासाठी काय केले हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपली कृती पक्षासाठी हानिकारक ठरू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असा सल्ला माणिकराव ठाकरे यांनी दिला.
हा हायकमांडचा निर्णय : डॉ. अंजली निंबाळकर
कुठलाही नेतृत्वबदल हा हायकमांडचा खाजगी निर्णय असतो. त्याबाबत हायकमांडची वेगळी पद्धत असते. हायकमांडचा निर्णय सर्वमान्य असतो आणि त्याबाबत दुमत असू शकत नाही. वेगवेगळ्या नेत्यांशी व्यक्तीगत चर्चा करून तसेच सर्वेक्षण करून हे निर्णय घेतले जातात, अशी माहिती सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.





