काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल
गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला. गेल्या १८ वर्षांपासून राज्यात सत्ता असलेल्या भाजपला काँग्रेसवर दोषारोप करावा लागतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीकाही पाटकर यांनी केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित पाटकर यांनी दामू नाईक यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. काँग्रेस सरकारच्या काळात पेरलेली बीजे आता उगवली असून त्याचे दुष्परिणाम भाजप सरकारला भोगावे लागत आहेत, असे दामू नाईक म्हणाले होते. गोवेकरांनी स्वतःच आपल्या जमिनी बाहेरील लोकांना विकल्या आहेत, त्यामुळे निर्माण झालेल्या वादांसाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.
काँग्रेसची बीजे भाजपने रूजवली
ज्या काँग्रेसच्या बीजांचा उल्लेख दामू नाईक करतात, त्याच बीजांचा वापर करून भाजपने सत्तेची फळे मिळवली, असा टोला पाटकर यांनी लगावला. १२ मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये १० जण काँग्रेसमधून आलेले आहेत. मग दामू नाईक कोणाला दोष देत आहेत? असा सवाल पाटकर यांनी उपस्थित केला. गेल्या ३८ वर्षांत काँग्रेसने १९ वर्षे आणि भाजपने १८ वर्षे राज्य केले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
गोवा दिल्लीकरांना आंदण
भाजपच्या राजवटीतच जमिनींची विक्री झपाट्याने सुरू झाली आहे. दिल्लीकरांना जमिनी खरेदी करण्यासाठी नगर नियोजन खात्यामार्फत रूपांतराची मोकळीक देण्यात आली आहे. लोकांकडे उपजीविकेसाठी पर्याय नसल्यामुळे त्यांना जमिनी विकाव्या लागत आहेत. भाजपचे लोक गोव्याबाहेर जमिनी विकत घेतात, असे दामू नाईक म्हणतात. या लोकांची यादी जाहीर केल्यास बरे होईल, असेही पाटकर यांनी म्हटले.
गुन्हेगारी पर्यटन वाढले
राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. अनेक गुन्हेगार येथे येऊन आसरा घेत आहेत. हे चित्र पाहता सरकारने गुन्हेगारी पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे की काय, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केला. काही पोलिस अधिकारीच गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत भीषण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.






