द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या

आमचें गोंय या फेसबुक पेजवरील श्री स्वामी समर्थांविषयीच्या कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे काम कायदा करेल. दोषी कोण आहे, हेतू काय होता, याचा तपास होईल. परंतु या घटनेपलीकडे जाऊन समाज म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण खरोखरच आपल्या संतांचे अनुयायी आहोत की त्यांच्या नावाने एकमेकांवर द्वेषाचा वर्षाव करणारे अनुयायी ?

इतिहास साक्ष देतो की कोणत्याही धर्मातील संत, महात्मे, योगी किंवा देवत्व प्राप्त विभूतींनी आपल्या आयुष्यात अपमान, बहिष्कार, छळ आणि संकटे सहन केली. तरीही त्यांनी सूडाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी प्रेम दिले, क्षमा दिली, करुणा दिली. श्री स्वामी समर्थ असोत, संत तुकाराम असोत, ज्ञानेश्वर माऊली असोत, बुद्ध असोत किंवा येशू ख्रिस्त सर्वांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्याची ताकद दिली.

आज मात्र चित्र अगदी उलटे दिसते. सोशल मीडियाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचे व्यासपीठ दिले, पण त्याचबरोबर संयम हरवला. श्रद्धा ही मनाची गोष्ट असते. ती जितकी वैयक्तिक, तितकीच पवित्र असते. परंतु अलिकडच्या काळात श्रद्धेचे सार्वजनिक प्रदर्शन, धार्मिक स्पर्धा आणि भक्तीचा आक्रस्ताळा उत्सव हे जणू नवीन सामाजिक फॅड बनले आहे. आपल्या श्रद्धेचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. ही केवळ दुर्दैवीच नाही, तर समाजासाठी धोकादायक आहे.

गोव्यात यापूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्ये झाली होती. लाखो भाविकांच्या भावना त्यातून दुखावल्या गेल्या. आज श्री स्वामी समर्थांविषयी अशाच प्रकारच्या कथित टिप्पणी समोर येत आहेत. उद्या कदाचित दुसऱ्या धर्मातील एखाद्या महनीय व्यक्तीबाबत असेच होईल. हे दुष्टचक्र थांबणार कधी?

विडंबन असे की, ज्या संतांनी आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवण्याची शिकवण दिली, त्यांच्या भक्तांच्या वर्तनातच आज क्रोध, मत्सर, अहंकार आणि द्वेष अधिक दिसून येतो. आपण संतांच्या शिकवणीचे अनुकरण करतो की केवळ त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःच्या भावना भडकवतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

समाजाला आज नव्या देवळांची नव्हे, नव्या माणुसकीची गरज आहे. श्रद्धेच्या नावाने बाजार मांडण्याऐवजी संतांच्या विचारांचा वारसा जगण्यात उतरवण्याची गरज आहे. कायदा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करेलच; पण समाजानेही आपल्या शब्दांवर, प्रतिक्रियांवर आणि सोशल मीडियावरील वर्तनावर संयम ठेवला पाहिजे. कारण धार्मिक भावना जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या श्रद्धेचाही तितक्याच आदराने स्वीकार करणे.

संतांनी कधीही माणसांना धर्माच्या कुंपणात विभागले नाही; त्यांनी माणसांना माणसाशी जोडले. म्हणूनच आज पुन्हा एकदा त्या अमर प्रार्थनेची आठवण करून द्यावीशी वाटते.

“हीच आमुची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे…
माणसाने माणसाशी, माणसासम वागणे.”

  • Related Posts

    सरकार कुणाला घाबरते ?

    एवढ्या मजबूत संख्याबळाचे सरकार विरोधकांच्या प्रश्नांपासून का दूर पळत आहे? जर सरकारच्या कारभारात पारदर्शकता, आत्मविश्वास आणि उपलब्धी असतील, तर विधानसभेपेक्षा त्या मांडण्यासाठी दुसरे योग्य व्यासपीठ कोणते? गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी…

    फोकस्ड राहूया… गोव्यासाठी!

    एक फलक, एक घोषणा, एक वादग्रस्त प्रसंग आणि संपूर्ण सार्वजनिक चर्चा मूळ प्रश्नापासून दूर नेली जाऊ शकते. ही रणनीती ओळखणे आवश्यक आहे. आझाद मैदानावर नीट पेपरलीक आंदोलनाच्या विजयोत्सवानिमित्त जमलेली युवाशक्ती,…

    You Missed

    31/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 31, 2026
    • 13 views
    31/07/2026 e-paper

    ई-२० पेट्रोलविरोधात‘ आप’चा निषेध मेळावा

    • By Gaonkaari
    • जुलै 31, 2026
    • 21 views
    ई-२० पेट्रोलविरोधात‘ आप’चा निषेध मेळावा

    द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या

    • By Gaonkaari
    • जुलै 31, 2026
    • 18 views
    द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या

    “ रो-रो फेरीबोटी खरेदी करा ”

    • By Gaonkaari
    • जुलै 31, 2026
    • 21 views
    “ रो-रो फेरीबोटी खरेदी करा ”

    सक्तीच्या E20 पेट्रोलविरोधात आपची मोहीम; १ ऑगस्टच्या राष्ट्रीय ऑनलाइन टाउनहॉलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

    • By Gaonkaari
    • जुलै 30, 2026
    • 18 views
    सक्तीच्या E20 पेट्रोलविरोधात आपची मोहीम; १ ऑगस्टच्या राष्ट्रीय ऑनलाइन टाउनहॉलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

    विधानसभा अधिवेशनापूर्वी जनतेच्या सहभागासाठी विरोधकांचे पुढाकार; काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डकडून सूचना मागविण्याचे आवाहन

    • By Gaonkaari
    • जुलै 30, 2026
    • 20 views
    विधानसभा अधिवेशनापूर्वी जनतेच्या सहभागासाठी विरोधकांचे पुढाकार; काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डकडून सूचना मागविण्याचे आवाहन