मुख्यमंत्र्यांचा कारापूरवासियांसोबत फोटोस नकार
गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)
कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्प रद्द करण्याची मागणी घेऊन गेलेल्या कारापूरवासियांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी थेट ‘सेटलमेंट’चा प्रस्ताव दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भेटीसंबंधी शिष्टमंडळासोबत फोटो घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी नकार दर्शवल्यामुळे कारापूरवासीय संतप्त झाले आहेत.
कारापूरवासीयांनी साखळी रविंद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने लोढा प्रकल्पाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असता, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता थेट प्रस्ताव ठेवला. “ज्यांचे कुळ प्रस्ताव सादर झाले नाहीत, त्यांनी ताबडतोब सादर करावेत, जेणेकरून लवकरात लवकर सेटलमेंट करता येईल,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या कारापूरवासीयांची थट्टा करत “किती दिवस आंदोलन करणार? आता पाऊस येईल मग काय? कोर्टात गेलात तर निकाल दहा वर्षांनी लागेल, तोपर्यंत तुम्ही जिवंत तरी असाल काय?” अशी भाषा वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
शिष्टमंडळासोबत फोटोस नकार
या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रचंड गुप्तता पाळण्याचे निर्देश दिले. शिष्टमंडळासोबत फोटो घेण्यास त्यांनी नकार दिला. कारापूरवासीयांचा लढा नियोजित लोढा प्रकल्पासहित जमिनीचे मूळ मालक विश्वजीत राणे यांच्या विरोधात असल्याने, ही भेट राणेंना कळल्यास ते नाराज होतील या भीतीने मुख्यमंत्र्यांनी भेट घाईगडबडीत उरकल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सेटलमेंटचा विपर्यास नको – मुख्यमंत्री
“कारापूरवासीयांनी कुळ प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. ते सरकार दरबारी दाखल झाले तर त्याचे सेटलमेंट लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करू,” असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘सेटलमेंट’ शब्दाचा विपर्यास नको, असेही त्यांनी सूचित केले. फोटोस नकार का दिला, असे विचारले असता “त्यांना आपणच आमंत्रित केले होते,” असे सांगून त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.
स्वप्नेश शेर्लेकर यांचा निषेध
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी कारापूरवासियांना दिलेल्या वागणुकीचा निषेध केला. “शिष्टमंडळासोबत ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. अन्यायाविरोधात लढणाऱ्या या महिलांना प्रोत्साहन देण्याऐवजी आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे,” असे ते म्हणाले. “हे आंदोलन यशस्वी होईपर्यंत तुम्ही जिवंत तरी असाल काय?” हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न संतापजनक ठरल्याचेही शेर्लेकर यांनी नमूद केले.





