गौरव बक्षी विरोधात चॅप्टर केसची शिफारस
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)
पत्रकार विश्वनाथ नेने यांनी चोडण येथील भोमकर कुटुंबियांची परप्रांतीय जमीन मालकाकडून होत असलेल्या छळवणुकीच्या प्रकरणावर स्टोरी केली. यामुळे खवळलेल्या गौरव बक्षी यांनी त्यांना फोनवरून धमकी दिल्याने तो अदखलपात्र गुन्हा नोंद होणार आहे. गौरव बक्षी यांच्यावर चॅप्टर केसची शिफारस करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
पत्रकार विश्वनाथ नेने यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंद झाला नसल्याने आज गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक सुदेश नाईक यांची भेट घेतली. यावेळी सुदेश नाईक यांनी हे प्रकरण अदखलपात्र गुन्ह्यांत येत असल्याचे सांगितले. गौरव बक्षी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करून त्याची चॅप्टर केससाठी शिफारस केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गौरव बक्षीकडून भोमकर कुटुंबाची सतावणूक
दिल्लीस्थित गौरव बक्षी हे आपल्या पत्नीसोबत गोव्यात स्थायिक झाले आहेत. ते मुख्यतः जमिनी व्यवहारात असून रिअल इस्टेट एजंट म्हणूनही त्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या कारवायांमुळे अनेकांची सतावणूक झाल्याने त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.
चोडण येथे त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर भोमकर नामक मुंडकार कुटुंब वास्तव करते. या कुटुंबाची पारंपारिक पायवाट अडवल्याने त्यांची कोंडी झाली आहे. या एकूणच कैफियतीचे वार्तांकन विश्वनाथ नेने यांनी केले होते. या वार्तांकनामुळे त्रस्त झालेल्या गौरव बक्षी आणि त्यांच्या पत्नी यांनी नेने यांना फोन करून अपशब्द वापरले, त्यांचा अपमान केला तसेच अप्रत्यक्ष धमकी दिली.
अदखलपात्र वर्गीकृत
भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार फोनवरून धमकी देणे किंवा एखाद्याची शांतता भंग करणे हा गुन्हा अदखलपात्र म्हणून वर्गीकृत आहे. पोलिसांना थेट गुन्हा दाखल करून तपास सुरू करता येत नाही; यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते.
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५१ नुसार एखाद्याला फोनवरून धमकावणे, अपमान करणे, त्रास देणे किंवा मानसिक शांतता भंग करणे हा गुन्हा अदखलपात्र ठरतो. गंभीर धमकी (जसे की जीव घेण्याची किंवा गंभीर दुखापत करण्याची धमकी) फोनवरून दिली तरीही हा गुन्हा अदखलपात्रच राहतो आणि त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. या गुन्ह्यांमध्ये आरोपीला जामीन मिळू शकतो.
चॅप्टर केस म्हणजे दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या अध्याय VIII अंतर्गत सुरू होणारी प्रक्रिया, ज्याला चॅप्टर प्रक्रिया असेही म्हणतात. यात पोलिस एखाद्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करू शकतात, जर त्यांना वाटले की तो समाजात गोंधळ घालू शकतो किंवा शांतता भंग करू शकतो.






