‘अवेकन गोअन्स’चा हल्लाबोल; शिक्षण खात्यात आमूलाग्र बदलांची मागणी
गांवकारी,दि.10 (प्रतिनिधी)
राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर ‘अवेकन गोअन्स’ने गंभीर चिंता व्यक्त केली असून, कंत्राटी व व्याख्याच्या तत्वावरील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण खात्यातील समन्वयाचा अभाव, डायोसेसन शाळांना मिळत असलेली कथित दुय्यम वागणूक तसेच मुख्याध्यापकांच्या थेट भरतीच्या प्रक्रियेवर संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिक्षण खात्यात सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोप केला.
मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते योगेश नागवेकर, अमर गांवकर तथा अन्य पदाधिकार्यांनी शिक्षण खात्याच्या कारभारावर टीका करताना मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खात्याची संपूर्ण पुनर्रचना करावी, अशी मागणी केली. शिक्षण संचालकांना निलंबित करून खात्यातील कारभाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
आकडेवारी जाहीर करा
राज्यात गेल्या काही वर्षांत किती शाळा बंद झाल्या, नव्या शाळांना किती परवानग्या देण्यात आल्या आणि त्यामागील निकष काय होते, याची संपूर्ण आकडेवारी सरकारने सार्वजनिक करावी, असे संघटनेने म्हटले आहे. प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संघटना (पीटीए) असणे आवश्यक असून शाळांच्या प्रशासनात पालकांचा प्रभावी सहभाग सुनिश्चित करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
मुख्याध्यापकांची थेट भरती रोखा
मुख्याध्यापकांची थेट भरती करण्याच्या प्रक्रियेवरही ‘अवेकन गोअन्स’ने आक्षेप घेतला. अनेक वर्षे सेवेत असलेल्या आणि अनुभव असलेल्या शिक्षकांवर या प्रक्रियेमुळे अन्याय होऊ शकतो, असा दावा करत या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
दिव्यांग भरतीत अनुभवाची अट रद्द
सरकारी खात्यांतील दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या ‘क’ वर्गातील पदांच्या भरतीमध्ये दीव्यांग उमेदवारांना अनुभवाच्या अनिवार्य अटीतून सूट देण्याचा आदेश कार्मिक खात्याने 8 सप्टेंबर रोजी जारी केला आहे. मात्र वैद्यकीय, तांत्रिक किंवा अन्य विशेष पदांसाठी केंद्रीय नियामक संस्थांनी निश्चित केलेले अनुभवाचे निकष कायम राहतील.
11 पालिका प्रभागांची पुर्नरचना झाली
राज्यातील 11 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांची पुनर्रचना निश्चित करण्यात आली आहे. मुरगाव, मडगाव, म्हापसा, कुडचडे-काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, वाळपई, पेडणे आणि सांगे या नगरपालिकांचा त्यात
समावेश आहे.





