ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

९ दहशतवादी तळ अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त

गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी)

भारतात युद्धसराव म्हणून मॉक ड्रिल सुरू असतानाच पहाटे १.०५ वाजता भारतीय संरक्षण दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. अवघ्या २५ मिनिटांच्या या कारवाईत ९० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
गुप्त आणि अचूक कारवाई
ही मोहीम दीड वाजता पूर्ण झाली. गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता, हे तळ त्या उद्देशानेच उभारले गेले होते. पाकिस्तानच्या नागरी वस्ती किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता भारतीय दलाने ही कारवाई यशस्वी केली. यामुळे पाकिस्तानचे दहशतवादाशी लागेबांधे स्पष्ट झाले आहेत.
संरक्षण दलाची संयुक्त पत्रकार परिषद
दिल्लीतील पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी मोहिमेचे तपशील दिले. यावेळी मोहीमेचे दृक्श्राव्य सादरीकरण देखील करण्यात आले.
देशभरातून कौतुक आणि पाठिंबा
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी संरक्षण दलाच्या धाडसाचे कौतुक केले आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्याचा सडेतोड प्रतिसाद
गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमांवर ऑपरेशन सिंदूरला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर असल्याचे सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भारताच्या दृढ संकल्पाचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
हवाई वाहतूक आणि सीमावर्ती भागात अलर्ट
या कारवाईनंतर उत्तर भारतातील अनेक विमानतळांवरील व्यावसायिक हवाई वाहतूक १० तारखेपर्यंत बंद करण्यात आली आहे. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील विमान प्रवासासाठी प्रवाशांनी आधी चौकशी करून प्रवास करावा, अशी सूचना विमान कंपन्यांनी दिली आहे.
शाळा आणि शिक्षण संस्थांना विश्रांती
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानातील सीमावर्ती भागांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कर्तारपूर कॉरिडॉरही तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
देशभरात मॉक ड्रिल
आज भारतात २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. भारत-पाक सीमेवरही भारतीय हवाई दल सराव करत आहे.
मॉक ड्रिलचे मुख्य उद्देश:
• नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देणे.
• सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि सुधारणा करणे.
• हवाई हल्ला, आग, दहशतवादी हल्ला यासारख्या संकटांमध्ये त्वरित प्रतिसाद देण्याचा सराव करणे.
मॉक ड्रिलमध्ये काय होणार?
• सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.
• सुरक्षा यंत्रणा आणि नागरी संरक्षण दल बचाव कार्य करतील.
• शाळा, मॉल, रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी सराव कवायती होतील.
गोव्यात मॉक ड्रिल कुठे होणार?
गोव्यात पणजी, मडगाव, वास्को, पेडणे आणि फोंडा येथे विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. येथे नागरी संरक्षण यंत्रणा, पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय असेल.
महत्त्वाची सूचना:
• नागरिकांनी घाबरू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
• सरकारी सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षेच्या उपाययोजना समजून घ्याव्यात.

  • Related Posts

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    उत्पल पर्रीकर यांचा एल्गार गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) गोव्याची राजधानी पणजी शहराची प्रतिष्ठा लयाला पोहोचली आहे. मोन्सेरात पिता-पुत्र यांच्या घराणेशाहीने राजधानीला वेठीस धरले असून पणजीची मुक्तता करण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत पणजीकरांनी…

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?

    मोन्सेरात पिता-पुत्रांकडून स्पष्टीकरण गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राजधानीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आणि त्यांचे पुत्र, महापौर रोहीत मोन्सेरात, या दोघांनीही आपण वैयक्तिकरित्या जुगाराविरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅसिनो हटविण्यासाठी…

    You Missed

    18/02/2026 e-paper

    18/02/2026 e-paper

    आमचे काही खरे नाही…

    आमचे काही खरे नाही…

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    17/02/2026 e-paper

    17/02/2026 e-paper

    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?