पाकिटे पोहोचली…

महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे.

राज्यात पहिल्यांदाच जिल्हा पंचायत निवडणुकांना राजकीय रंग चढला आहे. यापूर्वी कधीच इतक्या सक्रीयतेने, आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचा कारभार बाजूला सारून जिल्हा पंचायत उमेदवारांच्या प्रचारासाठी जीव ओतून काम करताना पाहायला मिळाले नव्हते. जिल्हा पंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात असल्याने भाजपसाठी चिन्हाची प्रतिष्ठा नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत काबीज करण्याच्या प्रयत्नात पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहेत. अर्थातच जिल्हा पंचायत निवडणुकांचा निकाल म्हणजे २०२७ च्या विधानसभेची चाहूल ठरेल. त्यामुळे भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाही. पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी आपापल्या मतदारसंघांत सक्रीयपणे काम करताना दिसत आहेत.
गेली १२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला आपल्या सरकारचा विकास लोकांना पटवून देण्यासाठी जी धडपड करावी लागते आहे, ती पाहताना प्रश्न पडतो की हा विकास लोकांना अनुभवता आलेला नाही काय? वास्तविक भाजप विकासाचे जे रंगीत चित्र तयार करते, ते खरे तर लोकांनी अनुभवायला हवे होते. लोकांना त्याची जाणीव का होत नाही, यावरूनच हा विकास काल्पनिक किंवा अवास्तव असावा, असे वाटते.
पेडणेच्या विकासाची जंत्री वाचताना पत्रादेवी–बांबोळी महामार्ग, मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ यांचीच यादी सादर केली जाते. मात्र आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि रोजगाराच्या बाबतीत पेडणेच्या अवस्थेवर कुणीही बोलायला तयार नाही. तुये–पेडणेत जीएमसी संलग्न इस्पितळाच्या इमारतीवर शंभर कोटी रुपये खर्च करून आता तिथे सामाजिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याच भाजप सरकारने धुळीस मिळवला. हे ते जाणूनही बोलू शकत नाहीत, कारण त्यांना पुन्हा पक्षप्रवेशाची आशा लागून राहिलेली आहे.
भाजपच्या एकूण यशाचे गमक या महिला आहेत. गावागावांत महिला स्वयंसहाय्य गट स्थापन करून त्यांची एक साखळीच ग्रामीण विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे. अनेक गटांचे खूप चांगले काम चालते. या उपक्रमांतून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे प्रामाणिक प्रयत्नही सुरू आहेत, यात वावगे नाही. परंतु या रचनेचा राजकीय वापरही भाजप खूप हुशारीने करत आहे. पक्षाच्या सभा, बैठकांना या महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे.
पक्षाच्या यशाचे हे फार मोठे गुपित इथे दडले आहे. याच कारणामुळे भाजपच्या प्रत्येक सभा, बैठकांत महिलांकडून नेत्यांवर होणारा पुष्पवर्षाव आणि एकूणच महिलांची उपस्थिती दिसून येते. या महिलांपर्यंत सोशल मीडिया पोहोचत नाही, आणि राजकीय विरोधक तर या महिलांपासून अजूनही दूर आहेत. वास्तविक हेच कारण आहे की भाजपला निवडणुका जिंकणे म्हणजे डाव्या हाताचा मळ वाटतो.
जोपर्यंत विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या तळागाळातील महिला व ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, आणि सरकारच्या अपयशाबाबत जागृती करणार नाहीत, तोपर्यंत भाजपचे कमळ या भ्रष्टाचार, कुशासन आणि बजबजपुरीच्या चिखलात कायम फुलत राहणार, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • Related Posts

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील काही करू शकणार नाहीत. कारण ते सत्तेत आणि या पदावर असताना या मंत्र्यांचा दबाव कायम त्यांच्यावर राहावा, या हेतूनेच श्रेष्ठींनी ही व्यक्ती त्यांच्या मागे…

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    सरकारने चिंबलकरांना अधिक वेठीस न धरता हा अट्टाहास सोडावा आणि या दोन्ही प्रकल्पांसाठी पर्यायी जागा शोधून या विषयाला पूर्णविराम द्यावा, एवढेच सांगावेसे वाटते. सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल गावातील आदिवासी समाज नियोजित…

    You Missed

    15/01/2026 e-paper

    15/01/2026 e-paper

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    14/01/2026 e-paper

    14/01/2026 e-paper