पर्वरीत वाहतूक नियोजनाचा बट्याबोळ…

मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझांची दमछाक


गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

पर्वरी उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे, हे खरे; परंतु या कामासाठी आवश्यक वाहतूक नियोजन सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खात्याने केले नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. वाहतूक कोंडीच्या विषयावर पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज पाहणी करून पर्यायी व्यवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांकडे काहीच ठोस आराखडा नसल्याचे उघड झाले.
पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही अडथळ्याविना वाहतूक थेट पणजीपर्यंत सुरळीत होऊ शकेल. मात्र, उड्डाणपुलाचे काम हाती घेताना घाई करण्यात आली. प्रारंभी वाहतूक कोंडीमुळे रोहन खंवटे यांनाच काम बंद करावे लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगितले होते. परंतु नागरिकांना बरेच त्रास सहन करून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि चिखल यातून मार्ग काढत लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनांचीही मोठ्या प्रमाणात झीज होत आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्थेची मोठी आश्वासने दिली गेली होती, ती मात्र धुळीस मिळाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या वाहतूक कोंडीची दखल घेतली होती. तिथेही न्यायालयाला खोटी माहिती देऊन फसवण्यात आले, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी आणि रोज प्रवास करणाऱ्यांनी व्यक्त केली.
कल्पनांचे इमले आणि वास्तवाचा गोंधळ
पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली असता, सरकारी अधिकारी केवळ पर्यायी व्यवस्थेच्या नावाने कल्पनांचे इमले उभारण्याचा आभास निर्माण करत असून वास्तव परिस्थितीबाबत सगळाच गोंधळ असल्याचे त्यांना जाणवले. वास्तविक लोकांना रामभरोसे सोडून हे काम केले जात असल्याचेही अनेकांना जाणवले.
यावेळी वाहतूक विभागाचे अधीक्षक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. इतके दिवस लोक त्रास सहन करत असताना कुणीही घटनास्थळी फिरकले नव्हते. आज मंत्री आणि उपसभापतीसोबत फिरावे लागल्याने अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. हे अधिकारी धुळीने त्रस्त झालेच, शिवाय हातातील पाणी घोटत असताना उपस्थित लोकांनीही कार्यालयात बसून लोकांचे हाल मुकाट्याने पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत रस्त्यावर आणून खरी परिस्थिती दाखवली जात नाही, तोपर्यंत त्यांना सामान्य लोकांचे काहीच पडलेले नसते, अशा प्रतिक्रिया उमटल्या.
स्पॅन बसवण्याचे काम जोरात
सध्या उड्डाणपुलाच्या स्पॅन बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. हे काम धोकादायक आणि जिकीरीचे असल्यामुळे, तसेच उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला बरीच कसरत करावी लागत आहे. सरकारी यंत्रणांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज असताना, उड्डाणपुलाच्या बाजूनेच वाहतूक सोडली जात असल्याने जराही हयगय झाली तर एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे ओळखूनच आता उपाययोजनांसाठी ही धावपळ सुरू झाली आहे.

  • Related Posts

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    विरोधक आणि सत्ताधारी सज्ज गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत आहे. २७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १४ दिवसांचे कामकाज होणार आहे.…

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबागवासीयांचे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेले नियोजित बंधाराविरोधातील आंदोलन सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. आंदोलन तीव्र करण्याच्या इराद्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी…

    You Missed

    05/03/2026 e-paper

    05/03/2026 e-paper

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    04/03/2026 e-paper

    04/03/2026 e-paper

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार