ॲड. राधाराव ग्रॅशीएश यांच्या पुढाकाराने २२ रोजी लोक परिषद
गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)
राज्यात सतत तीन वेळा सत्तेवर असलेल्या भाजपच्या राजवटीत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी केवळ राजकीय विरोधकांवर अवलंबून न राहता, जनतेनेच योग्य उमेदवारांची निवड करून ते विरोधकांना द्यावेत, असे आवाहन माजी आमदार ॲड. राधाराव ग्रॅशीएश यांनी केले.
मडगाव येथे येत्या शुक्रवार, २२ रोजी विशेष लोक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जनतेसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि गोव्याच्या हिताची चिंता करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्याच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरवावी, असे आवाहन ॲड. ग्रॅशीएश यांनी केले.
सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली
राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघानुसार आपले गट तयार करावेत. स्थानिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या विचारांतून चांगल्या, प्रामाणिक आणि गोव्याच्या हिताची काळजी घेणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करून ती विरोधी पक्षांकडे शिफारस करावी. जे विरोधी पक्ष या उमेदवारांचा स्वीकार करतील, त्यांच्यासाठीच काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवणारे अनेक उमेदवार निवडून आल्यानंतर पक्षांतर करतात. मात्र, जनतेनेच उमेदवार ठरविल्यास पक्षांतर करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. आणि जर कोणी तसे केले, तर त्याला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा युक्तिवाद ॲड. ग्रॅशीएश यांनी केला.
आतिशी यांचे वक्तव्य निषेधार्ह
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी शिक्षणमंत्री आतिशी यांनी काँग्रेससोबतच्या युतीबाबत केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असल्याचे ॲड. ग्रॅशीएश यांनी सांगितले. संपूर्ण देश मतचोरीच्या मुद्द्यावर एकत्र येत असताना, आम आदमी पक्ष या विषयावर मौन का बाळगतो आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या विषयावर अद्याप तोंड उघडलेले नाही. वास्तविक, बोगस मतदारांचा मुद्दा सुरुवातीला आप पक्षानेच उपस्थित केला होता. आता तो विषय केंद्रस्थानी आला असताना, आपचे मौन वेगळीच शंका निर्माण करणारे ठरत आहे, असेही ॲड. राधाराव ग्रॅशीएश यांनी नमूद केले.







