भागीदार रवी रेड्डीकडे संशयाचे बोट
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)
मुड्डोवाडा–साळगांव येथे स्वतःला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न करणारे आणि त्यातून गंभीर जखमी होऊन नंतर मृत्यू पावलेले अश्पाक खान यांच्या प्रकरणी घातपाताची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. अश्पाकचे बंधू मुख्तार खान यांनी त्याचा व्यावसायिक भागीदार रवी रेड्डी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुळचे महाराष्ट्रातील आणि सध्या कळंगुट येथे स्थायिक झालेले अश्पाक खान (वय ५०) हे हॉटेल व्यवसायिक होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
व्यावसायिक भागीदाराच्या घरीच आग
अश्पाक खान आणि रवी रेड्डी यांनी मिळून हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. रवी रेड्डी हा आयएनएस मांडवी येथे नोकरीला असून व्यवसायातील सर्व पैसे त्याने स्वतःकडे ठेवले होते. परतफेडीचे आश्वासन देऊनही पैसे परत न केल्याचे अश्पाक यांनी वारंवार आपल्या कुटुंबाला सांगितले होते. सुमारे ६ कोटी रुपयांचा हा व्यवहार असून याची चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत व्हावी, अशी मागणी मुख्तार खान यांनी केली आहे.
ही घटना शुक्रवारी, दि. १० रोजी साळगांव येथे रवी रेड्डी राहत असलेल्या इमारतीत घडली. त्यामुळे अश्पाक यांनी स्वतःला आग लावली की त्यांना पेटवण्यात आले, याचा तपास होणे आवश्यक आहे. रवी रेड्डी राहत असलेल्या इमारतीतच ही घटना घडल्याने त्यामागील कारणे शोधणे गरजेचे असल्याचे मुख्तार खान यांनी नमूद केले. रवी रेड्डी याचा व्यावसायिक विस्तार आणि अनेकांशी असलेले संबंध लक्षात घेता, महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्यापूर्वी त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, साळगांव पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.






