भाजपची ‘हायकमांड’ संस्कृती

काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीलाही गोवा भाजपने मागे टाकले आहे. केंद्राचा एखादा आदेश किंवा सूचना म्हणजे “सर आखोंपर” अशा तऱ्हेने राज्यातील नेते वागताना दिसतात.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पक्षाला एक प्रादेशिक अस्मितेचा चेहरा प्राप्त करून दिला होता. भाजपच्या अनेक राष्ट्रीय धोरणांच्या विरोधात गोव्यातील भाजपचे स्वतंत्र धोरण असायचे. त्यामुळेच गोव्यातील भाजपला अल्पसंख्याक समाजाची पसंती मिळवण्यात पर्रीकरांना यश आले. सत्तेत येण्यासाठी अल्पसंख्याकांचा पाठिंबा आवश्यक आहे, हे पर्रीकरांना उमगले आणि त्यांनी योजनाबद्ध डाव आखून २०१२ मध्ये त्याची प्रचिती दिली. राज्यातील अनेक ख्रिस्ती नागरिक तर पर्रीकरांवर जणू फिदा होते. “पोर्रीकार कापाजदाद” असे म्हणून ते त्यांचे कौतुक करायचे. सासष्टीतील ख्रिस्ती समाज हा प्रामुख्याने चर्च संस्थेच्या अधिपत्याखाली आहे. विशेषतः उच्चवर्णीय ख्रिस्ती हे पर्रीकरांचे कट्टर समर्थक होते. बार्देश, पेडणे, मुरगाव, केपे, काणकोण आदी भागांतील ख्रिस्ती समाजावरही पर्रीकरांनी आपली छाप पाडली होती. भाजपकडे वळलेला ख्रिस्ती समाज आज मात्र पक्षापासून दूर गेलेला आहे. पर्रीकरांनी ख्रिस्ती समाजाला भाजपकडे जोडले होते. परंतु विद्यमान भाजपपासून हा समाज दूरावलेला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ख्रिस्ती नेत्यांच्या राजकीय स्वार्थाला आणि अगतिकतेला फुंकर घालून काही नेत्यांना पक्षाकडे वळवले आहे. ख्रिस्ती समाजाने भाजपविरोधात आपला नेता निवडावा आणि भाजपने त्यालाच आपल्याकडे वळवावे, असे एक राजकीय गणितच रूढ झाले आहे. निवडणुकीच्या काळात पुढे काय होईल, याची चिंता न करता, राजकारणात मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा, असा विचार नेत्यांमध्ये भाजपने रुजवला आहे. पूर्वी काँग्रेसवर सर्वच राजकीय विरोधक हायकमांड संस्कृतीवरून टीका करत असत. या टीकेत इतर प्रादेशिक पक्षांसोबत गोवा भाजपही सहभागी होता. भाजप त्यावेळी सत्तेत नसल्यामुळे त्यांना ही टीका करता येत होती. तरीही केंद्रात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भाजपने आपला प्रादेशिक चेहरा टिकवून ठेवला होता आणि पक्षात मोकळीक होती. आजचा भाजप मात्र “एक देश, एक संविधान, एक भाषा, एक निवडणूक” असे म्हणत देशाच्या संघराज्यीय रचनेला फाटा देत, विविधतेने नटलेल्या देशाला एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करत आहे. हे धोरण देशासाठी फायदेशीर ठरेल की नाही, हा चर्चेचा आणि सखोल अभ्यासाचा विषय आहे. या गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे गोव्यातील भाजप पूर्णपणे हायकमांड संस्कृतीच्या आहारी गेलेला आहे. काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीलाही गोवा भाजपने मागे टाकले आहे. केंद्राचा एखादा आदेश किंवा सूचना म्हणजे “सर आखोंपर” अशीच भूमिका राज्यातील नेत्यांची दिसते. हे स्वाभाविकच आहे, कारण आज जी सत्ता आणि पदे ते भोगत आहेत ती त्यांच्या कर्तृत्वामुळे नाही, तर केंद्राच्या कृपाशिर्वादामुळे मिळालेली आहेत. त्यामुळे हा मान, सन्मान केंद्राची देणगी आहे, याची जाणीव त्यांना सातत्याने करून दिली जाते. परिणामी राज्यातील सत्ताधारी नेत्यांना केंद्राच्या हुकुमाचे ताबेदार म्हणूनच वागावे लागते.
या हायकमांड संस्कृतीचा गोव्यावर नेमका काय परिणाम होणार? गोव्याचे वेगळेपण या संस्कृतीत टिकू शकेल का? या धोरणाची सक्ती सुरू राहिली, तर आपले गोंयकारपण टिकवणे कठीण होईल, असे म्हणावे लागेल.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak