भोमकरांच्या पदरी अखेर निराशा

महामार्ग रूंदीकरण विरोधी याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

राष्ट्रीय महामार्ग ४(ए) च्या प्रस्तावित रूंदीकरणास विरोध करीत पर्यायी मार्गाची शिफारस करणारी भोमवासीयांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली. प्रस्तावित जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात गेलेली असून प्रक्रिया खूप पुढे गेलेली आहे. त्यामुळे ती रद्द करणे अयोग्य ठरेल, या कारणास्तव न्यायालयाने याचिका नाकारली. यामुळे भोमकरांच्या पदरी निराशा आली आहे.
ही याचिका डॉ. एडविन डिसा व इतर ५६ जणांनी दाखल केली होती. भोम व खोर्ली गावांतील ग्रामस्थांचा ह्यात समावेश होता. न्यायमूर्ती भारती डांग्रे व निवेदिता मेहता यांनी हा निवाडा दिला. भूसंपादन प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ३(ड) अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते.
याचिकेदारांचे मुद्दे व सरकारचा युक्तिवाद
याचिकेदारांनी लोकवस्ती, धार्मिक स्थळे, आणि सार्वजनिक सुविधांच्या हानीचा मुद्दा मांडला होता. त्याऐवजी पर्यायी मार्ग स्वीकारल्यास कमी खर्च, कमी अंतर आणि कमी नुकसान होईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, राज्य सरकारच्या वतीने एडव्होकेट जनरल यांनी याचिकेदारांचे सर्व मुद्दे फेटाळून लावत असे सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार जारी होणाऱ्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देता येत नाही. हा प्रकल्प राष्ट्रीय हिताचा असून दोन राज्यांना जोडणारा आणि आपत्कालीन प्रवासासाठी अत्यावश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, भोमा–खोर्ली हा एकमेव अपूर्ण टप्पा असल्याने तिथे वाहतूक कोंडी होत आहे. याचिकेदारांपैकी केवळ एका व्यक्तीनेच हरकत नोंदवली होती व विरोध केवळ आपल्या जागेवरून प्रकल्प जाऊ नये, या भूमिकेवर आधारित होता.
पर्यायी मार्ग व पर्यावरणीय प्रश्न
भोमवासीयांनी सूचवलेला पर्यायी मार्ग पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रातून जातो, अशी माहिती एडव्होकेट जनरल यांनी दिली. ग्रामसभांनी ठराव घेतले असले तरी शासनाच्या विकास योजनांना हरकत घेण्याचा अधिकार त्यांना नाही, असे ते म्हणाले. पर्यावरण आणि व्यवहार्यता अहवालही खाजगी संस्थेमार्फत तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१५३ किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी ६९ किलोमीटरचा भाग गोव्यात येतो. फक्त भोमा–खोर्ली टप्पा अपूर्ण असून उर्वरित ठिकाणी रूंदीकरण पूर्ण झाले आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसंबंधी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मात्र सरकारकडून न्यायालयात स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही.
पुढील कृती ठरवणार
गोवा खंडपीठाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र हा निवाडा भोमवासीयांच्या विरोधात गेला आहे. या निर्णयाचा सखोल अभ्यास करून पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. सरकारच्या आश्वासनांमध्ये व न्यायालयातील निवेदनांमध्ये मोठा फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. “कोण कुणाला फसवतं आणि का?” हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी सांगितले.

  • Related Posts

    थिवीतील रोख रकमेचे गुपीत काय ?

    हळदोणा अपक्ष उमेदवाराची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) थिवीतील मोठ्या रोख रकमेच्या चोरीप्रकरणी सखोल चौकशीची मागणी हळदोणा जिल्हा पंचायतीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले आलवितो जोझेफ ऑगस्त डिसिल्वा…

    हातात नारळ की नारळावर हात ?

    आरजीपीचा फुटबॉल स्वबळावर गोल करण्याच्या तयारीत गांवकारी, दि.५ (प्रतिनिधी) मोठ्या दिमाखात घोषणा झालेली महाविरोधी आघाडी घडण्यापूर्वीच बिघडल्यात जमा झाली आहे. आघाडीतील घटकांना विश्वासात न घेता काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्याचे निमित्त…

    You Missed

    आचारसंहितेची निव्वळ थट्टा

    आचारसंहितेची निव्वळ थट्टा

    06/12/2025 e-paper

    06/12/2025 e-paper

    थिवीतील रोख रकमेचे गुपीत काय ?

    थिवीतील रोख रकमेचे गुपीत काय ?

    हातात नारळ की नारळावर हात ?

    हातात नारळ की नारळावर हात ?

    सशक्त शब्दाचा मान राखा !

    सशक्त शब्दाचा मान राखा !

    05/12/2025 e-paper

    05/12/2025 e-paper