बांबोळीच्या विषयासह ताम्हणकरांची हस्तक्षेप याचिका दाखल
गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी येथील अपघातप्रवण क्षेत्र आणि भोमातील महामार्गाचा तिढा या दोन्ही विषयांवरील आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांची हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. भोमाची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा सोमवारी कालोत्सव असल्याने या याचिकेच्या निमित्ताने देवीचा कौलच झाल्याचा आनंद भोमवासीयांनी व्यक्त केला आहे.
राजस्थान, तेलंगणासह अन्य राज्यांत राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातांची स्वेच्छा दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ वकील अॅड. आत्माराम नाडकर्णी यांची अमायकस क्यूरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांची सुरक्षा, दर्जा आणि एकूणच विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विस्तृत स्पष्टीकरण मागितले आहे. या स्वेच्छा दखलीचा आधार घेऊन आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांची सद्यस्थिती, बांबोळीतील रस्ते अपघात आणि भोमा महामार्गाचा तिढा या विषयांवरून हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. सोमवारी या याचिकेवर जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर अखेर ही याचिका स्वेच्छा दखलीत समाविष्ट करण्यात आली.
बांबोळीचा मार्ग कुणासाठी बदलला?
राष्ट्रीय महामार्गाचा मूळ आराखडा बदलून एका बिल्डरला मदत करण्यासाठी बांबोळीचा मार्ग बदलण्यात आला. या बदलामुळे येथे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत अनेक अपघात होऊन कित्येक बळी गेले आहेत. हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असून गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा दंत महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कुजीरा शैक्षणिक संकुल असल्यामुळे ही बेफिकीरी अनेकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता ताम्हणकर यांनी आपल्या याचिकेत नमूद केली आहे.
भोमा प्रकरणी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा
भोमवासीय गेली अनेक वर्षे महामार्गाच्या आराखड्याला विरोध करत आहेत. या मूळ आराखड्यामुळे येथील घरे व धार्मिक स्थळे उध्वस्त होतील, असे सांगूनही सरकार त्यांची दिशाभूल करत आहे. आता केंद्र सरकारने एकही धार्मिक स्थळ पाडले जाणार नाही, असे स्पष्टीकरण दिले असले तरी मूळ आराखडा लोकांना दाखवला जात नाही.
मुळात महामार्गाचा आराखडा हा भविष्यातील गरज ओळखून तयार केला जातो. तिथे रुंदी कमी करून तो महामार्ग बनवला जात असेल तर भविष्यात हे क्षेत्र अपघातांसाठी आमंत्रण ठरणारे बनेल. भोमवासीयांनी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव सरकारला दिला होता, परंतु त्याचा विचार करण्याबाबत सरकार अजिबात रस दाखवत नाही.
या एकूणच प्रकरणाचा विस्तृत मुद्दा ताम्हणकर यांनी आपल्या याचिकेत नमूद केल्यामुळे या याचिकेच्या निमित्ताने भोमवासीयांना दिलासा मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.





