दामू नाईक यांच्या वक्तव्यावरून नाराजी
गांवकारी, दि.१५ (प्रतिनिधी)
स्मार्ट मीटर लागू करण्यावरून विरोधक आणि जनतेचा आक्रोश वाढल्यानंतर सरकारने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना एकाकी सोडल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये बळावली आहे. “वीज खात्याने लोकांना विश्वासात घेतले नाही”, या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वक्तव्यामुळे मगो कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
स्मार्ट मीटर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात लोकांमध्ये नाराजी असून विरोधकांनीही हा विषय लावून धरल्यानंतर केवळ सरकारची पाठराखण करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या निर्णयाचे उघडपणे समर्थन केले होते. एवढे करून वीजमंत्र्यांना विश्वासात न घेताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट मीटर लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. मडगांवचे आमदार दिगंबर कामत यांनी वीजमंत्र्यांशी चर्चा न करता थेट वीज खात्याच्या कार्यालयात जाऊन स्मार्ट मीटरला विरोध केला. त्यात भर म्हणून दामू नाईक यांनी वीजमंत्र्यांवरच स्मार्ट मीटरच्या घोळाचा आरोप ठेवल्याने मगो कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मगोला टार्गेट करण्याचा हा छुपा डाव असू शकतो, अशी शक्यता मगोच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
स्मार्ट मीटरच्या निर्णयाला मंजुरी कुणाची?
मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेच्या तीव्र विरोधाची दखल घेत गोव्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पाला स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, केवळ प्रकल्प थांबविण्याचा आदेश देऊन या प्रकरणातील मोठ्या आर्थिक उत्तरदायित्वाचा प्रश्न संपत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटरच्या खरेदी व अंमलबजावणीसाठी सुमारे ८९० कोटी रुपये खर्चासाठी बांधिलकी दर्शविण्यात आली आहे. “इतका मोठा आर्थिक निर्णय कसा घेण्यात आला, त्यास मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे, हे जाणून घेण्याचा गोव्यातील जनतेला पूर्ण अधिकार आहे. जनतेचा पैसा पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशिवाय खर्च केला जाऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.
वीज खात्याला दिलेली भेट ही मडगांवचे पक्षबदलू आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची केवळ राजकीय स्टंटबाजी होती. आधीच निश्चित झालेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.







