भाजपसाठी सावधतेचे संकेत !

संयम आणि सहनशीलता हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. हे गुण त्यांनी कधीच ढासळू दिले नाहीत आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ पदावर टिकू शकले. ही शिकवण भाजपच्या नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे.

सोमवारी घटस्थापनेचा दिवस होता. नवरात्रोत्सवाचा प्रारंभ. अमावस्या संपून लगेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना झाली. हा शुभ दिवस भाजपसाठी मात्र काहीसा अशुभ ठरल्याचे चित्र दिसून आले. अलिकडेच पक्षाने विविध मोर्चांच्या नव्या अध्यक्षांची निवड जाहीर केली होती. घटस्थापनेच्या दिवशी भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदांद्वारे आपली हजेरी लावली. मात्र, दोघांनाही काहीसे अपशकुन घडल्याचा अनुभव आला.
भाजयुमोचे नवे अध्यक्ष तुषार केळकर यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत थेट धमकीवजा भाषा वापरली, तर महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर या तीन सिलिंडर योजनेच्या प्रश्नावर इतर दोन सहकाऱ्यांसह अनुत्तरित राहिल्या. या दोन्ही घटनांमुळे युवा आणि महिला अध्यक्ष सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि त्यांची ओळख निर्माण झाली.
हे कमी म्हणून की काय, संध्याकाळी पणजी शहरात जीएसटी बचत उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे १८ जून रस्त्यावरील दुकानदारांच्या भेटीसाठी गेले असता, एका दुकानदाराने जीएसटीमुळे सामान्य व्यापाऱ्यांची बिकट अवस्था कशी झाली हे स्पष्टपणे सांगितले. या संवादाचा व्हिडिओही चांगलाच गाजला. या सगळ्या घटनाक्रमातून भाजपला सावध राहण्याचा संकेत मिळाल्याची गरज निश्चितपणे आहे.
गेली बारा वर्षे भाजप सत्तेवर आहे. केंद्रात आणि राज्यातही दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यानंतर सत्तेच्या संरक्षण कवचाची जाणीव होणे स्वाभाविक आहे. भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही काहींचे मत आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाने अनेक नेते घडवले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे त्याचे उत्तम उदाहरण. काँग्रेसच्या सत्ताकाळात युवकांचे आणि राज्याचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलने करत या नेत्यांनी आपली छाप निर्माण केली होती. त्यांना मनोहर पर्रीकर आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले होते.
आज भाजपमध्ये मार्गदर्शक नेते निवृत्त झाले आहेत. आक्रमकता ही युवकांची ओळख मानली जाते. तुषार केळकर यांच्याकडून ती प्रकट झाली, हे वावगे नाही. मात्र विरोधकांनी भाजप मुख्यालयासमोर मोर्चा नेल्यास, कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून उत्तर देणे शक्य आहे. राज्यात अराजकतेचा आरोप विरोधक करत असताना, भाजयुमो अध्यक्षांच्या भाषेतून तोच सूर उमटल्याचे दिसते.
आक्रमकता गरजेची आहेच, पण संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदावर आहेत. संयम आणि सहनशीलता हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. हे गुण त्यांनी कधीच ढासळू दिले नाहीत आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ पदावर टिकू शकले. ही शिकवण भाजपच्या नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे.
केंद्रातील भाजपकडून विविध कार्यक्रमांची यादी प्रदेश समित्यांना पाठवली जाते आणि हे कार्यक्रम पक्षाला बंधनकारकपणे राबवावे लागतात. भाजप ही संघटना आज पूर्णवेळ रचनेत कार्यरत आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याने ही संघटनात्मक रचना यशस्वीपणे उभारली आहे. उर्वरित पक्षांना हेच करावे लागेल, अन्यथा भाजपच्या संघटन ताकदीला तोंड देणे कठीण होईल.
दीर्घकाळ सत्तेचा उपयोग भाजपने संघटनात्मक मजबुतीसाठी केला आहे. काँग्रेसने कधीच संघटनेवर भर दिला नाही आणि त्यामुळेच आज हा पक्ष चाचपडत आहे. विरोधक टीका करणारच. तेच त्यांचे काम. पण म्हणून विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा योग्य नाही. लोकांची मने जिंकून विरोधकांनाही आपलेसे करणे ह्यातच खरी मजा आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President