गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?

इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय?

सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारींकडे पोलिस स्थानके दुर्लक्ष करतात. एखादे प्रकरण गुन्हा शाखेकडे द्यायचे असेल, तर मोठा आटापीटा, आंदोलने करून सरकारला भाग पाडावे लागते. पण येथे मात्र स्थानिक पोलिस स्थानकाला अजिबात वास लागू न देता, थेट गुन्हा शाखेकडेच तक्रार दाखल केली जाते, आणि गुन्हा शाखेकडून कारवाई करून पीडिताची चोरीला गेलेली रक्कमही वसूल करून दिली जाते. पहिल्या प्रथम या धाडसी कारवाईसाठी गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन. इतरही सामान्य नागरिकांच्या तक्रारींप्रती गुन्हा शाखेकडून हीच तत्परता दाखवली जाईल,अशी अपेक्षा करता येईल.
हा अजब प्रकार बार्देश तालुक्यात घडला. या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतीय संविधान जरी सर्वांना समानता बहाल करत असले, तरी सरकार आणि प्रशासनाच्या दारी काही लोकांना विशेष आणि अतिमहनीय असा मान प्राप्त आहे. आता इतरांच्या मानसन्मानामुळे आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.
दोनापावला येथील धेंपो कुटुंबाच्या बंगल्यातील दरोड्याचा तपास सुरू आहे की बंद करण्यात आला, याची खात्री नाही. पण बार्देशातील एका प्रभावी राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबात चोरी प्रकरणामुळे पोलिसांची बरीच धावपळ झाली. गुन्हा शाखेने तात्काळ कारवाई केली आणि चोरीला गेलेले १६ लाखांचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला जातो. घरातील नेपाळी मोलकरणीनेच चोरी केली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने नेपाळला जाऊन या प्रकरणाचा तपास लावला. या मोलकरणीला पोलिस पथक गोव्यात घेऊन येणार आहे.
हा राजकीय नेत्याचा कर्मचारी जुने गोवे परिसरात राहतो. चोरी झाल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली. थेट गुन्हा शाखेकडे तक्रार करण्याचा विचार या कर्मचाऱ्याच्या पत्नीला सहजपणे आला हे देखील एक नवलच ठरावे. जुने गोवे पोलिस स्थानकात या चोरीची काहीच नोंद नाही. घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात मोलकरीण तीन मोठ्या बॅगा घेऊन पसार होत असल्याचे फुटेज मिळाल्याची माहिती आहे. १६ लाखांचे दागिने आणि कागदपत्रांसाठी तीन बॅगांची गरज लागण्याची शक्यताच नाही. मग मोलकरणीने या बॅगांत भरून नेले तरी काय? या प्रश्नाचे उत्तर अजून सापडू शकले नाही.
पीडितांकडून दिलेल्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या मालाचा शोध लागल्यामुळे, उर्वरित बॅगांत काय होते याचा शोध घेण्याची तसदी गुन्हा शाखेने घेतली नसेल, असे म्हणता येईल. या एकूणच प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या चोरीची माहिती स्थानिक पोलिस स्थानकाला का देण्यात आली नाही? चोरीची तक्रार थेट गुन्हा शाखेत केल्यानंतर, तिथे तात्काळ कारवाई का करण्यात आली? ही स्पेशल ट्रीटमेंट सामान्य नागरिकांनाही उपलब्ध आहे की केवळ ठरावीक लोकांसाठीच आहे? इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय? नेपाळला गेलेल्या पोलिसांना त्या इतर बॅगांमध्ये नेमके काय चोरून नेले होते, हे माहीत असेल का? की माहीत असूनही त्या बॅगांमध्ये काय होते हे सांगण्याची पोलिसांना गरज वाटली नाही ? या सगळ्या प्रकरणात नेमके सत्य काय? हे फक्त पोलिसच सांगू शकतील.

  • Related Posts

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    आगीशी खेळ नको…

    नेपाळचा इतिहास गोव्याला इशारा देतो, जनतेच्या भावना दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या, तर असंतोष आंदोलनात रूपांतरित होतो. नेपाळमध्ये “जनआंदोलन” एका दिवसात उभे राहिले नाही. अनेक वर्षे लोकांच्या मनात साचलेला असंतोष, अन्यायाची भावना,…

    You Missed

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper

    परवानगीचेही राजकारण

    परवानगीचेही राजकारण

    तरुण तेहलानी यांना टीसीपीचा दणका

    तरुण तेहलानी यांना टीसीपीचा दणका

    Governor’s Office Forwards Complaint Against Captain of Ports; Public Grievances Dept Seeks Action Report

    Governor’s Office Forwards Complaint Against Captain of Ports; Public Grievances Dept Seeks Action Report

    गोमंतकीय कलावंतांचा महाराष्ट्रात झंकार; “तो मी नव्हेच!” नाटकाच्या दौऱ्याचे कौतुक

    गोमंतकीय कलावंतांचा महाराष्ट्रात झंकार; “तो मी नव्हेच!” नाटकाच्या दौऱ्याचे कौतुक

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions