इंटकचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)
राज्यातील पाच ते दहा वर्षांपर्यंत दीर्घकाळ सरकारी सेवेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांना आगामी ऑगस्टपूर्वी सेवेत कायम (नियमित) करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) ने राज्य सरकारला दिला आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते डॉ. हौशिला प्रसाद शर्मा, शैतान सिंह सोलंकी आणि राज्य प्रभारी अॅड. अजय प्रभूगांवकर उपस्थित होते. हजारो कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने ऑगस्टपर्यंत त्यांची मागणी मान्य न केल्यास राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करून राज्यव्यापी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
वेदांताच्या खाणकामाशी संबंधित सुमारे १५० कामगारांच्या सेवासमाप्तीविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याची घोषणा इंटकने केली. संबंधित कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या रोजगाराचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या सेवांचे नियमितीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कामगारांच्या रोजगार सुरक्षिततेसाठी आवश्यक निर्णय त्वरित न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला






